जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन

जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन

अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची माहिती, विभागीय आयुक्तांकडून आवर्तन सोडण्याला मिळाली मंजुरी

परभणी : जायकवाडी कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ व उन्हाळी हंगामासाठी ४ पाणी आवर्तनांना तसेच निम्न दुधना कालव्यातून रब्बी हंगामासाठी ३ पाणी आवर्तन व उन्हाळी हंगामासाठी ३ पाणी आवर्तनांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची विभागीय‌ आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी आढावा बैठक पार पडली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर रोजी जायकवाडी व २६ नोव्हेंबर २०२४ रोजी निम्न दुधना प्रकल्पाचे कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये जायकवाडी कालव्यावर ९७ हजार ४४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते तर निम्न दुधना प्रकल्पांतर्गत परभणी व जालना जिल्ह्यातील ३४ हजार ४३८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते, परभणी जिल्ह्यातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रतिपादन केले. परभणी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी डाव्या कालव्यातून व निम्न दुधना कालव्यातून तात्काळ पाणी आवर्तन सोडण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यावर विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी कालवा सल्लागार समिती सन २०२४-२५ च्या बैठकीमध्ये जायकवाडी कालव्यातून व निम्न दुधना कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्याची परवानगी देण्यात आली. तरी जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी संबंधित शाखा कार्यालयामध्ये पाण्याची मागणी विहित नमुन्यात करावी, तसेच पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!