भारतीय संविधान सामान्यांच्या जगण्याचा पाया
प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांचे मत, नूतन कन्या शाळेत संविधान दिन साजरा
सेलू/परभणी : भारतीय संविधानाने आपल्याला जशी मुलभूत अधिकार दिली आहेत. तशीच कर्तव्यही दिली आहेत. तेव्हा विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या मुलभूत अधिकारासह कर्तव्याची जाणीवही ठेवावी. एक आदर्श आचारसंहिता असलेले भारतीय संविधान हा मानवतावादी धर्म ग्रंथ आहे. सर्व सामान्यांच्या उन्नतीचे मार्ग संविधानानेच खुले झाले असून सामान्य माणसांच्या जगण्याचा पाया, असे मत प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने ‘ हर घर संविधान ‘ उपक्रमांतर्गत मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात डॉ.कुलकर्णी बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निशा पाटील होत्या. या वेळी मैथिली गावंडे, जागृती ताठे, अपेक्षा कांगणे, हर्षदा गलबे, ज्ञानेश्वरी जाधव, भक्ती शेलार, अक्षरा गायकवाड, रुक्सार बकाली या विद्यार्थीनींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. दत्तराव घोगरे, रोहीदास मोगल, डॉ.सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती. उद्देशिकेचे वाचन वैशाली चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. शशिकांत देशपांडे यांनी आभार मानले.