निम्नदुधना : कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी झेपावले
रब्बीतील पिकांना सिंचनाची सोय, शेतकऱ्यांना दिलासा
सेलू/परभणी : रब्बीतील पिकांना सिंचनाची सोय करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. सलग अकरा दिवस दोन्ही कालव्यात पाणी सोडले जाणार असून, कालवा लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर पिकांना या पाण्याचा आधार मिळणार आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडीकडे वळले होते. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे.
यंदा निम्न दुधना प्रकल्पात जून महिन्यापासूनच पाण्याची आवक सुरू झाली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे दूधना प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा निर्माण झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. निम्न दूधना प्रकल्पाचा डावा कालवा ६९ किमी व उजवा कालवा ४८ किमी अंतराचा आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा, त्यानंतर गहू व ज्वारीचे क्षेत्र आहे. दोन्ही कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सेलू, मानवत, जिंतूर व कालवा लाभ क्षेत्राला पाणी मिळणार आहे.