सकल हिंदू समाजाचा जिंतूरमध्ये मोर्चा
बांगलादेशातील अत्याचाराचा निषेध : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन
जिंतूर/परभणी : बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर कट्टरपंथीयांद्वारे त्यांची घरे, दुकाने जाळून अत्याचार केला जात आहे. याचे तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी दिसून येत आहे. या सर्व अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिंतूर तालुका सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी, १० डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार येथून या मोर्चास प्रारंभ झाला. जागृत हनुमान मंदिर – मुख्य चौक- पोलीस ठाणे महामार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेन रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज, हिंदू समाजातील हिंदुत्ववादी संघटना, साधु-संत सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या हाताला काळी फीत बांधून मानवी साखळी करून निषेध व्यक्त केला. हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेश सरवदे मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना देण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.