परभणी जिल्ह्यात बंद, रास्तारोको
संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेचा तीव्र निषेध, शांतता राखण्याचे जिल्हा, पोलीस प्रशासनाचे आवाहन
परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान करण्याचा प्रयत्न मंगळवारी सायंकाळी झाला. घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी तसेच विविध संघटनांनी बुधवारी, ११ डिसेंबर रोजी जिल्हा ‘बंद’ची हाक दिली. ‘बंद’ला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. बंद दरम्यान ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलनही करण्यात आले.
जिल्हाभरात आंबेडकरी अनुयायांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवित प्रशासनाला निवेदने सादर केली आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करावी. घटनेची तत्काळ चौकशी करावी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संरक्षण द्यावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दुपारच्या सुमारास परभणी शहरातील काही भागात दुचाकी वाहनांची तोडफोड, करून काही दुचाकी वाहने जाळण्याच्या तसेच दगडफेकीच्या घटना घडल्या. रेल्वे स्टेशनरोड परिसरात जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जिल्हा व पोलिस प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१६३ कलम अंतर्गत जमावास प्रतिबंध
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी
परभणी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून आदेश जारी करत परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. टेलिफोन, एसटीडी, भ्रमनध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स, ध्वनीक्षेपक, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचे आदेश लागू राहतील.
शांतता राखण्याचे जिल्हाधिकारी गावडे यांचे आवाहन
परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारीही व्हिडिओ क्लिपद्वारे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करु नये व कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. दक्षता घ्यावी. शांतता राखावी असे आवाहन श्री.गावडे यांनी केले आहे.