भारताची खरी ताकद एकत्रित कुटुंबातच : अशोक नायगावकर
नायगावकरांच्या कवितांनी हास्यकल्लोळाची अनुभूती
सेलू/परभणी : भारताची खरी ताकद एकत्रित कुटुंबातच असून, याचे श्रेय महिलांना जाते, असे मत प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सेलू येथे व्यक्त केले. दरम्यान, ‘मिश्किली’ कार्यक्रमात नायगावकर यांनी सादर केलेल्या कवितांनी सभागृहात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.
सेलू येथील माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने सायंकाळी साडे सहा वाजता साई नाट्यगृहात प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या ‘मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रम रंगतदार ठरला. कार्यक्रमात नायगावकर यांनी दैनंदिन जीवनातील प्रसंगांना मिश्कीलपणे टिपून उपस्थितांना हास्यकल्लोळाची आनंदाभूती दिली. आणि जीवनातील ताणतणाव क्षणभरासाठी दूर करणार्या, सद्यस्थितीशी सांगड घालणार्या
आपल्या हास्य कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांना खळखळून हसवत खिळवून ठेवले. संदर्भ आणि दाखले देत अंतर्मुख केले. श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी नायगावकर यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. प्रा.हेमचंद्र हडसनकर यांनी नायगावकर यांचा परिचय दिला. सूत्रसंचालन संध्या फुलपगार यांनी केले. सुभाष मोहकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.