सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय
अॅड.प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
परभणी : न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंंतर छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय रूग्णालयात विच्छेदन करून मृतदेह सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी परभणीत आणण्यात आला. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ‘जय भीम जय संविधान’, ‘सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढून जिंतूर रोडवरील स्मशानभुमीत सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात मंडप उभारून दुपारपासून कार्यकर्ते व नागरिक एकत्र जमायला सुरूवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. व्यासपीठावरून आंबेडकरी चळवळीतील मान्यवर नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, वडार समाजाचे नेते विजय चौगुले, विजय वाकोडे, भीमराव हत्तीअंबीरे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रवी सोनकांबळे, सुधीर साळवे, संजय सारणीकर, बाळासाहेब भराडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील जनसमुदाय उपस्थित होता.
ही लढाई शेवटपर्यंत लढा : प्रकाश आंबेडकर
यावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात श्री.आंबेडकर म्हणाले,सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पोलीस सांगत होते पण पोलिसांच्या मारहाणीतून त्यांच्या शरिरावर अनेक ठिकाणी झालेल्या जखमांमुळे हा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याला जे कोणी दोषी असतील त्यांना सजा होणारच. मात्र जे साक्षीदार आहेत त्यांनीही चिवटपणे ही लढाई शेवटपर्यंत लढली पाहिजे. पोलीस यंत्रणेतही काही ‘अनगाईडेड मिसाईल’ आहेत. दिशाहीन असणार्या मिसाईलवर नियंत्रण आणा असे आपण पोलीस अधीक्षकांना म्हणालो आहोत असेही यावेळी श्री. आंबेडकर यांनी जनसमुदायाला सांगितले.
आम्हाला न्याय हवाय: आई विजाबाईची मागणी
भारतीय संविधान मानणारा माझा मुलगा सोमनाथ याला शिकून वकील व्हायचे होते. तो एलएलबीच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत होता. पोलिसांनी घरातून उचलून नेऊन केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मयत युवकाची आई विजाबाई व्यंकटराव सूर्यवंशी यांनी केली आहे. याबाबतचा व्हिडीओदेखील समाज माध्यमावरून व्हायरल झाला.
छायाचित्र : उत्तम बोरसुरीकर