शिकविण्यात आनंद भरा : शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी
सेलूत श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभागाच्या वतीने व्याख्यान
सेलू/परभणी : केवळ धडे आणि कविता शिकवणे म्हणजे शिकवणे नव्हे, तर राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या पिढ्या संस्कारांनी तयार करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः वाचन आणि लेखन केले पाहिजे. शिक्षकच समाजाला प्रेरणा आणि वैचारिक नेतृत्त्व प्रदान करतात. त्यामुळे आपल्या वाट्याला आलेल्या कामाचे छंदात रूपांतर करा; कंटाळा, शिकवण्यातला तोच तोपणा, यांत्रिकपणा दूर सारा आणि सामाजिक जाणीवा जागृत ठेवणाऱ्या पिढ्यांच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांशी मैत्रीद्वारे शिकविण्यात आनंद भरा, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सेलू येथे केले.
साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प; पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने साई नाट्यगृहात बुधवारी, १८ डिसेंबर रोजी श्री हेरंब कुलकर्णी यांनी गुंफले. ‘ शिक्षकांसाठी साने गुरुजी ‘ या विषयावरील हे त्यांचे ६५ वे व्याख्यान होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. याप्रसंगी संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, केंद्रप्रमुख डॉ.शरद ठाकर यांची उपस्थिती होती.
हेरंब कुलकर्णी म्हणाले, ” शिक्षकांनी साने गुरुजींचा सांगावा समजून घेतांना साने गुरूजींसारखी सहानुभूती, उत्कटता, प्रेम अंगी बाळगून, विद्यार्थ्यांप्रती करुणा आणि संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जपत समाजासाठी सदैव सेवावृत्तीने कार्यरत राहावे. नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे शिकवण्यात जिवंतपणा आणावा ” सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन आणि विद्यार्थ्यांनी ‘ खरा तो एकची धर्म ‘ हे प्रार्थना गीत गायले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुभाष बिरादार यांनी केले. बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. व्याख्यानास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, दत्तराव पावडे, गोविंदभाऊ जोशी, मुकेशराव बोराडे, सर्जेराव लहाने, चंद्रशेखर मुळावेकर, चंद्रप्रकाश सांगतानी, ललिता गिल्डा यांच्यासह शिक्षक शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानासाठी सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, अशोक लिंबेकर, राजेंद्र सोनवणे, रामकिशन कटारे, सुनील तोडकर, आरती कदम, व्यंकटराव तोरणाळे, बाळू बुधवंत, फुलचंद गावीत, बाबासाहेब हेलसकर, सुरेश हिवाळे, सुनीता सांगुळे, संतोष मलसटवाड, ठोंबरे, बालाजी देऊळगावकर, चौधरी, रामपुरकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.