केंद्राकडून नियमांत बदल : सरसकट उत्तीर्णचे धोरण रद्द; पाचवी, आठवीत नापास करण्याची मुभा

केंद्राकडून नियमांत बदल : सरसकट उत्तीर्णचे धोरण रद्द; पाचवी, आठवीत नापास करण्याची मुभा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली :  सरकारी शाळांमध्ये पाचवी आणि आठवीतील विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्याच इयत्तेत पुन्हा बसविले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या दोन इयत्तांतील आता नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले जाणार नाही. याबाबत शिक्षण हक्क कायद्यात सन २०१९मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी हा नियम आधीच रद्दबातल केला होता.
पाचवी आणि आठवीत अनुत्तीर्ण करण्याची मुभा देण्याबाबत काढलेल्या राजपत्रीय अधिसूचनेत म्हटले आहे, की एखादा विद्यार्थी पुढील इयत्तेत जाण्यासाठीचे वेळोवेळी निश्चित करण्यात आलेले आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला आणखी अध्यापन करावे आणि दोन महिन्यांत फेरपरीक्षा घ्यावी. मात्र, फेरपरीक्षेतही विद्यार्थ्याला आवश्यक गुण मिळविण्यात अपयश आल्यास त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच पुन्हा बसविण्यात यावे. विद्यार्थी पुन्हा
त्याच इयत्तेत बसल्यानंतर वर्गशिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांला नेमके काय समजलेले नाही, हे विविध मूल्यांकनाद्वारे समजून घेऊन त्याला जादा शिकवावे.अर्थात, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. शिक्षण मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ही अधिसूचना केंद्र सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळांना लागू होईल. त्यामध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा यांचा समावेश असणार आहे.

महाराष्ट्रात गेल्या वर्षीपासूनच नियम लागू

पुणे : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी आणि आठवीत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय २०२३-२४ या शैक्षणिक वर्गापासून लागू केला आहे. त्याचा निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार शैक्षणिक कामगिरी चांगली नसलेला विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, त्याची एका महिन्याने पुन्हा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत तो परत अनुत्तीर्ण झाल्यास, त्याला संबंधित इयत्तेसाठी अनुत्तीर्ण करण्यात येते. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता शैक्षणिक कामगिरी चांगली नसलेल्या विद्याथ्यांची फेरपरीक्षा ही दोन महिन्यांनी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी, ही फेरपरीक्षा एका महिन्याने घेण्यात येत होती, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचानलयालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.

अधिसूचना नेमकी काय ?
■ पाचवी किंवा आठवीतील एखादा विद्यार्थी पुढील इयत्तेत जाण्यासाठीचे आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला जादा अध्यापन करून दोन महिन्यांत फेरपरीक्षा घ्यावी.
■ फेरपरीक्षेतही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच पुन्हा बसवावे.
■ वर्गशिक्षकांनी संबंधित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावे.
■ विद्यार्थ्याला नेमके काय समजलेले नाही, हे विविध मूल्यांकनांद्वारे समजून घेऊन त्याला जादा शिकवावे.
■ प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नाही.


credit – Mata

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!