‘गाणे गोजिरवाणे’ बालमनावर संस्कार रुजवतात
कवी इंद्रजित भालेराव यांचे प्रतिपादन, ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाे उद्घाटन
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते मंगळवारी, २४ डिसेंबररोजी झाले. यानिमित्ताने आयोजित ‘गाणे गोजिरवाणे’ या कार्यक्रमात भालेराव यांनी सादर केलेल्या काव्यगायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.’गाणे गोजिरवाणे’ बालमनावर संस्कार रुजवतात, असे कवी भालेराव यावेळी म्हणाले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा.इंद्रजित भालेराव, प्राचार्या शीतल सोनटक्के, गयाताई भालेराव, कथाकार बबनराव आव्हाड, शिवसांब सोनटक्के, मधुरा उमरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘गाणे गोजिरवाणे’ बालमनावर संस्कार रुजवतात, असे नमूद करून कवी भालेराव यांनी गावाकडे चल माझ्या दोस्ता, बाप, शिक बाबा शिक आता लढायला शिक, एकुलती एक लाडाची लेक, नहान अशा बहारदार कविता आपल्या खास शैलीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ माझे मायबाप या गीताने समारोप केला. अध्यक्षीय भाषणात प्रा.किरण सोनटक्के यांनी इंद्रजीत भालेराव यांचे साहित्य सर्जनशील असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर संस्कार रुजविते. शिष्य या नात्याने भालेराव यांच्या शिकवण्याच्या अनुभव घेतला आहे, असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. प्रास्ताविकात प्रा.शीतल सोनटक्के यांनी भालेराव यांच्या विविध कवितांमधून स्त्रियांच्या वैश्विक दुःखाप्रती मांडलेली संवेदना तसेच शेतकरी, गाव, गावातील माणसं यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संवेदनशील नोंदी नमूद केल्या. दीपक शेळके यांनी भालेराव यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.पंढरीनाथ कदम यांनी केले. मंगेश भोपळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समन्वयक, विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.