जिथे आहात तिथे सुखाने राहा
मानसोपचारतज्ज्ञ डॉ.नंदू मुलमुले यांचे आवाहन, परभणीत “साद मैत्रीची” व्याख्यानमाला
…या सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
परभणी : माणसाचे जीवन निरंतर सुखाचा शोध घेण्यासाठी आहे. पण सुख अपेक्षासापेक्ष, व्यक्तीसापेक्ष आणि कालसापेक्ष आहे; सुख अंतिमही नाही; ते ओसरते. त्यामुळे जिथे आहात तिथे सुखाने राहा, असे आवाहन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.नंदू मुलमुले यांनी केले. बाल विद्या मंदिर, परभणीच्या १९९१ बॅचच्या वतीने आयोजित “साद मैत्रीची” व्याख्यानमालेत त्यांनी “सुख म्हणजे नक्की काय असते?” या विषयावर विविधांगी वस्तुनिष्ठ अनुभवांवर भाष्य करून उपस्थित रसिकांना अंतर्मुख केले. शनिवारी (दि.२८) संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेचे हे ७ वे विचारपर्व आहे.
यावेळी विचारमंचावर बाल विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, डॉ. वृषाली देशपांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आपल्या विवेचनात डॉ. मुलमुले म्हणाले की,”आपल्या शास्त्रामध्ये यश-सुख-आनंद आणि समाधान अशी पुरुषार्थाची चौकट आहे. ही चौकट स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनाच्या संदर्भात आहे. सर्वांनाच वरील चौकट सुरक्षित हवी असते. निश्चित सर्वांनीच यासाठी आपल्यातील कौशल्ये विकसित करून आणि अपेक्षित मर्यादा ठेवून जीवन जगावे. कारण मर्यादित अपेक्षांवर मानवाचे सुख अवलंबून आहे. इंद्रिय भोगाशी सुख अवलंबून आहे. या गोष्टी आपण जाणून जपल्या पाहिजेत. मानसिक जडणघडणेवरही सुख अवलंबून असते. सुखाच्या कल्पना सातत्याने बदलत असतात. साध्या-साध्या गोष्टींमध्ये आपल्याला अर्थपूर्ण जीवन जगता येते. अपेक्षेशिवाय कुणासाठी साधी गोष्टही करणे महत्त्वाचे आहे. उत्तम नाते संबंध जपून सुखाची व्याप्ती समृद्ध करता येते. उद्दिष्टांमुळे दिशा ठरते पण उद्दिष्ट साध्य झाले नाही म्हणून दुःखी होऊ नका. कार्यकारणभाव समजून घ्या आणि जीवनाचा आनंद जपा. विशिष्ट वयाच्या पातळीवर सुखाच्या संकल्पना साकार होतात आणि अनुभवाने त्या मागेही पडतात. त्यामुळे सुखाच्या बाबतीत माणसाने समाधानी असावे. संत कवी तुकाराम यांनी सांगितलेले आहे की,’चित्ती असू द्यावे समाधान!’ हेच सुख जपण्याचे अंतिम सूत्र आहे”, असे सांगून ते म्हणाले की, “सुखी जीवन करण्यासाठी प्रत्येक माणसाने सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्या जपाव्यात. माणसाने आपल्या मर्यादा ओळखाव्यात, परिस्थितीचा स्वीकार करावा, क्षमाशीलता जपावी, अपयश सहजतेने घ्यावे, चांगल्या गोष्टींची कृतज्ञता बाळगावी आणि जीवन सहज आणि सोपे होण्यासाठी विनोदी वृत्ती असावी”, त्यांनी या गोष्टी सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रारंभी डॉ. मुलमुले यांचा परिचय अतुल करमाळकर यांनी करून दिला. तर व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन अरुण टाक यांनी केले. उपस्थित रसिकांचे आभार भूषण घोडके यांनी मानले.