‘परभणी भूषण’ पुरस्काराने छाया मुंदडा सन्मानित
प्रत्येकाने समाजाला काहीतरी दिले पाहिजे, समाजासाठी काहीतरी करा, पैसे नाहीत तर वेळ द्या, ज्ञान द्या त्यातून अनेकांचे घरसंसार उभे राहतील कारण आजच्या काळात अशा अनेकांना तुमच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे आपण समाजभान कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन सोलापूर येथील उद्योजिका चंद्रिका चौहान यांनी केले.
परभणी : ‘झरीकर मसाले’ हा ब्रँड निर्माण करणार्या यशस्वी महिला उद्योजिका छायाताई अशोककुमार मुंदडा यांना या वर्षीच्या ‘परभणी भूषण’ पुरस्काराने बुधवारी, १ जानेवारी रोजी सोलापूर येथील उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान आणि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, दोहड व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे होते. याप्रसंगी दैनिक गोदातीर समाचारचे संपादक रमेश गोळेगावकर, डॉ.आसाराम लोमटे, अॅड.माधुरी क्षीरसागर, सखाराम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी चंद्रिका चौहान म्हणाल्या की, उद्योगवर्धिनी संस्थेद्वारे सुमारे ३ हजार महिलांचे सबलीकरण केले आहे. हे कार्य कसे सुरू झाले, काय काय अडचणी आल्या आणि त्यावर कसा मार्ग काढला याची माहिती दिली. तसेच भविष्यात समाजासाठी कोणत्या प्रकारच्या कामांची गरज आहे याचा वेध घेत सर्व नागरिकांनाही समाजकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. नगरसेवक म्हणून केलेल्या कार्यकाळात शासकीय यंत्रणेकडून काम कसे करून घ्यायचे याचा अनुभव मिळाला. त्याचा उपयोग सामाजिक कार्य करताना झाला. भाषेचा अडसर दूर सारत कौटुंबिक अडचणीतून सुरू केलेल्या भाकरी व्यवसायामुळे आज १ हजारापेक्षा अधिक महिला उद्योजक बनल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती मुंदडा यांचे कार्य प्रेरणादायी असल्याने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.काळे यांनी श्रीमती मुंदडा यांच्या रूपाने महिला सक्षमीकरणाचे सामर्थ्यशाली उदाहरण पहावयास मिळाल्याचे सांगून येणार्या काळात महिला अर्थसत्तेत आपली भागिदारी वाढवून भारताला निश्चितपणे महासत्तेकडे घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्तविक करतांना डॉ.लोमटे म्हणाले की, २०१३ सालापासून दैनिक ‘गोदातीर समाचार’ने हा पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एखाद्या क्षेत्रात झोकून देवून काम करीत आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक करणार्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सन्मान व्हावा, त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा या उद्देशाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक उद्यमशील महिला प्रतिकूल परिस्थितीत ५०० ग्रॅम मसाल्यापासून व्यवसाय सुरू करते आणि आज २० कोटीची वार्षिक उलाढाल असलेला उद्योग भरभराटीस नेते या अथक परिश्रमांचा गौरव करता यावा म्हणून यंदा श्रीमती मुंदडा यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सागितले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर तर, आभार अॅड.माधुरी क्षीरसागर यांनी मानले. गोदातीर समाचार आणि पुरस्कार निवड समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला आमदार डॉ.राहुल पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्र मणि , राम भरोेसे महाराज, डॉ.तुकाराम महाराज गरूड, डॉ.मीराताई गरूड, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.दत्तात्रय मगर, अॅड.अशोक सोनी, माधवराव आजेगावकर, श्रीमती हेमाताई रसाळ, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, बाबासाहेब जामगे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
पुरस्कार स्विकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती मुुंदडा यांनी मला मिळालेला ‘परभणी भूषण’ पुरस्कार हा माझा गौरव नसून संपुर्ण झरीकर टीमचा आहे. झरीकर परिवार हा माझा परिवार असून दरवर्षी आम्ही बहीण-भावाचे पवित्र नाते जपत रक्षाबंधन सण साजरा करतो. ५० ग्रॅम मसाले विक्रीपासून झरीकर मसाले उद्योगाची कशी भरभराट झाली याचा संपूर्ण प्रवास त्यांनी कथन केला. त्यात आलेली संकटे, अडचणींवर मात करून दोन्ही मुलांच्या मदतीने हे यश मोठ्या जिद्दीने व कष्टाने मिळवल्याचे त्यांनी सांगितले
.