सहानुभूती नको; हक्क हवा
जिंतूर येथील कार्यक्रमात श्रीगौरी सावंत यांची साद
जिंतूर/परभणी : आम्हीसुध्दा समाजाचा एक भाग आहोत, ही भावना प्रत्येकाने बाळगली पाहिजे. आम्हाला सहानुभूती नको, तर आमचा हक्क हवा आहे, अशी साद तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणार्या श्रीगौरी सावंत यांनी घातली आहे.
जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी, ७ जानेवारीरोजी दर्पणकार बाळासास्त्री जाभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समाज आणि मातृत्व’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे-बोर्डीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, अॅड.मनोज सारडा, प्रताप देशमुख, प्रिया देशमुख, सुरेखा टाले, वैभव वट्टमवार, डॉ. देवराव कराळे, डॉ. रविकिरण चांडगे, विजय चोरडिया, रत्नदीप कळमकर, किशोर देशपांडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
तृतीयपंथी नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य व केंद्र सरकार काहीच करत नाही, अशी खंत व्यक्त करीत सावंत यांनी, राज्य सरकारने सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केले पाहिजे. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे. मुलं-मुलं असतात ती कुणाचीही असो त्यात त्यांचा काय दोष? ज्या महिला एकल पालक आहेत, त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, निहाल अहमद, एम.ए.मजीद, गजानन चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मो.शेख यांनी केले. शेख शकील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.