पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा
वालूर मंडळातील शेतकऱ्यांची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
सेलू/परभणी : सेलू तालुक्यात सप्टेंबर २०२४ मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत पंचनामे होऊनही अद्याप पिक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे
या संदर्भात तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांना २३ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामात सेलू तालुक्यातील वालूर महसूल मंडळात सप्टेंबर २०२४ मध्ये एकाच दिवशी २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमध्ये पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून अद्याप मिळालेली नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर रामेश्वर गाडेकर, संपत राठोड, दादासाहेब गाडेकर, प्रशांत नाईक, अशोक गाडेकर, दिलीप टाके, विकास जाधव आदींच्या सह्या आहेत.