जाणून घ्या संविधान निर्मिती कशी झाली ?

जाणून घ्या संविधान निर्मिती कशी झाली ?

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात व्याख्यान, सुरेश रणखांबे यांचे मार्गदर्शन

सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सव 2024-25 अंतर्गत “घर घर संविधान” या उपक्रमांतर्गत ” संविधान निर्मितीची प्रक्रिया ” या विषयावर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सुरेश रणखांबे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमपूजनाने व्याख्यानाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर सुरेश रणखांबे, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, मुख्याध्यापक बालासाहेब हळणे,जेष्ठ शिक्षिका अलका धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात सिद्धार्थ एडके यांनी संविधानाबद्दल माहिती देत संविधान हा ग्रंथ मोलाचा असल्याचे सांगितले. व्याख्यानात सुरेश रणखांबे म्हणाले की,ब्रिटिशांनी आपल्या भारतात त्यांनी तयार केलेले कायदे राबवले. 16 मार्च 1946 रोजी ब्रिटिशांनी भारतीयांना जाहीर केले की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत व तुम्ही भारतीयांनी भारताचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची निर्मिती करावी.संविधान निर्मिती प्रक्रिया कशी राबवली गेली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.संविधान निर्मिती होत असताना संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास देखील केला.आणि संविधान निर्मितीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर संविधानाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र मेहनत करून देशासाठी हे संविधान तयार केले.भारतीय संविधानाचे 22 भाग आहेत. त्यात 395 कलमे व 8 परिशिष्ट आहेत.आणि संविधान पूर्ण झाल्यानंतर घटनेचा आराखडा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 26 नोव्हेम्बर 1949 रोजी सुपूर्द केला.आणि हाच दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो.आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण संपूर्ण देशाने हे संविधान अंगिकारले व तेव्हापासून संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार करण्यास सुरू झाला. यासोबत संविधान निर्मिती मध्ये झालेल्या अनेक प्रक्रिया सुरेश रणखांबे यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.

तसेच संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्य, सर्वांसाठी समान कायदा, मतदान अधिकार, यासोबत भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे,अधिकार यासह अनेक सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.सर्वांच्या विकासासाठी संविधान अत्यंत मोलाचे आहे व संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला आपली हक्क व कर्तव्ये जपता येतात असेही त्यांनी सांगितले.संविधानामुळे नागरिकांना मिळालेले विविध अधिकार तसेच संविधानातील विविध कलमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मारेवाड तर आभार किशोर खारकर यांनी मानले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!