माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी : न्या.नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई /छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (वय ८७) यांचे शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे. न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म १९३८ चा. वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहीत असणाऱ्या चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक परंपरा हेच लेखनाचे केंद्रस्थान मानले. विधि आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून तर नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधि महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. २८ वर्षे वकिली व्यावसाय केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. मराठवाड्यातील साहित्य आणि वाड्मयीन विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला.