मराठवाड्यासाठी एक लाख कोटींची पाणी योजना : उपमुख्यमंत्री अजित पवार
पश्चिमेकडील पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविणार
परभणी : भविष्यात मराठवाड्याला पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील असून नाशिक भागात पश्चिमेकडे पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला जाते, ते वळवून मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना प्रगतीपथावर आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
याप्रसंगी माजीमंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आ.राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आदींची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, येत्या 3 मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून यात दि. 10 रोजी अर्थसंकल्पात मी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. परंतु लाडक्या बहिणींसह गरिबांच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत.
केंद्रातील सत्तेचा महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोग करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजू समाज घटकांसाठी असंख्य योजना राबवत आहेत. कोट्यवधी लोकांना घरकुल देण्यात आले. तरुणांना रोजगार देणार्या अनेक योजना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार काम करत आहे.
गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. हे वातावरण लवकरात लवकर निवळले पाहिजे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगारांना कुणीही पाठीशी घालता कामा नये, कारण गुन्हेगार हा कायदा, नियम, संविधानापेक्षा मोठा नसतो, असेही ते म्हणाले.