देशात तीव्रतेने वाढणार्या आर्थिक असमानतेचे मोठे आव्हान
कॉम्रेड प्रकाश कारत यांचे मत, सेलूतील श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेला प्रतिसाद
सेलू (जि.परभणी) : विशालकाय आणि विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान सक्षम आहे. कसोटीच्या विविध स्तरावर खरे उतरलेले आहे. आणि लोकांच्या श्रद्धेमुळे ७५ वर्षांनंतरही मजबूत आहे. मात्र, मागील काही काळापासून देशात तीव्रतेने वाढणार्या आर्थिक असमानतेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संविधानानुरूप लोकशाही संघराज्य प्रणाली, देशाची एकात्मता अबाघित राखण्यासाठी; तसेच आर्थिक, राजकीय, सामाजिक समता आणि न्याय पूर्ण क्षमतेने प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाला अधिक मजबुती प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात त्यासाठी सजगतेने प्रयत्न करण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत यांनी केले आहे.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४९ वे पुष्प शुक्रवारी, २८ फेब्रुवारीरोजी कॉम्रेड कारत यांनी गुंफले. ‘ भारतीय संविधानाची ७५ वर्षे : नवीन आव्हाने ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाला मूर्त स्वरूप देण्यात अनेकांचे योगदान आहे, असे नमूद करून कॉम्रेड कारत यांनी संविधानातील महत्त्वांच्या पैलूंवर आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रकाश टाकला. व्यक्ती पूजा आणि विविध बाबींवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडेही कारत यांनी लक्ष वेधले. कारत म्हणाले, की जगातील बहुतांशी देशात कोणत्या न कोणत्या कारणाने संविधान तयार झाले आणि रद्दही झाले. धर्म दुय्यम असावा. राष्ट्र व संविधान मोठे असावे. महिलांना एक तृतीयांश राजकीय आरक्षण देण्याचा संविधानिक बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत. परंतु, ‘एक देश एक निवडणूक’ अव्यवहार्य आहे. मागील काही काळापासून सत्तेच्या केंद्रीकरणामुळे राज्यांपेक्षा केंद्र अधिक प्रबळ होत आहेत. संघराज्य प्रणालीसाठी ही बाब धोकादायक असून राज्ये दुर्बल होणे हे एकात्मतेला, विविधतेला बाधक आहे, असे ते म्हणाले. सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन यांनी अशोक लिंबेकर लिखित ‘ ये भारत का संविधान है ‘ हे गीत गायले. प्रास्ताविक सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी केले. सूत्रासंचलन नीलेश बिनायके यांनी केले. व्याख्यानास कॉम्रेड अजीत अभ्यंकर, कॉ.दत्तूसिंग ठाकुर, कॉ. प्राची हतवलेकर, कॉ.रामकृष्ण शेरे, कॉ.भगवान भोजने, कॉ.रामेश्वर पौळ, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, डी.के.देशपांडेगुरूजी, नंदकिशोर बाहेती, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, गोविंदभाऊ जोशी, नागरिक, महिला तसेच मानवत, पाथरी, जिंतूर, परभणीसह बाहेरगावाचे श्रोतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – सेलू (जि.परभणी ) येथील श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कॉम्रेड प्रकाश कारत यांनी शुक्रवारी विचार मांडले – शंभू काकडे