अर्थसंकल्प २०२५-२६ : विकासाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ
परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
महिला सशक्तीकरण ते ग्रामीण विकास-महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग
मुंबई/परभणी : महाराष्ट्र सरकारने सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरण, शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळणार असून, हा अर्थसंकल्प ‘विकासाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ’ ठरणार आहे. अशा शब्दांत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर साकोरे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक बळ मिळेल, कृषी आणि सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव तरतुदींमुळे नागरिकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत. हा अर्थसंकल्प केवळ आश्वासनांचा नाही, तर प्रत्यक्ष परिवर्तन घडवणारा आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी स्वतः कटिबद्ध राहीन. हा विकास प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या समृद्ध आणि स्वयंपूर्ण भविष्यासाठी एक मोठे पाऊल ठरेल, असेही मंत्री बोर्डीकर यांनी नमूद केले आहे.