पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १९: पवित्र पोर्टल प्रणाली लागू केल्यापासून राज्यात आतापर्यंत 18 हजार 800 शिक्षकांची पदभरती झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य किशोर दराडे यांनी शिक्षक भरती आणि शिक्षकेत्तर पदांची भरती याबाबत सभागृहात अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.
सन 2011 मध्ये पटसंख्येबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पटसंख्येची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, त्यानंतर राज्यात शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षक भरतीसाठी विषेश मोहिम राबवण्यात आली आणि 2016 मध्ये भरतीवरील बंदी उठवण्यात आली. तसेच 2017 मध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. तसेच शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादेची अट ही फक्त प्राथमिक शाळांसाठी असून माध्यमिक शाळांसाठी अशी कोणतीही अट नाही. शिक्षकांची पदे पटसंख्येवर अवलंबून असल्याने संच मान्यतेची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संच मान्यतेची प्रक्रिया प्रगतीपथावर असून राज्यात 10 हजार 940 रिक्त शिक्षक पदांची मागणी पवित्र पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. यापेकी 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून शिपाई हे पद कायमतत्वावर भरता येणार नसल्याचेही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.
शाळांचा दर्जावाढ व नवीन मंजुरीसंदर्भात शासन सकारात्मक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १९: स्वयंअर्थसहाय्य तत्वावर मान्यताप्राप्त वर्ग इयत्ता 6 वी ते 12 वी दर्जावाढ व वर्ग इयत्ता 1 ली ते 12 वीच्या नवीन मंजुरीच्या प्रकरणी शासन सकारात्मक असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
अर्धा तास चर्चेदरम्यान सदस्य जयंत असगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.
शाळांकडून केली जाणारी शुल्क आकारणी आणि पालकांकडून घेतले जाणारे शुल्क याविषयी चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त करून मंत्री भुसे म्हणाले की, शाळांसाठीच्या निकषांची ज्याप्रमाणे चर्चा होते तशाच प्रकारे या विषयांची चर्चा झाली पाहिजे. राज्यात राज्य मंडळ 13 हजार 664, सीबीएससीच्या 1 हजार 204 राज्य मंडळ व सीबीएससी 15 अशा पद्धतीने एकूण 15हजार 261 शाळाना परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये ऑनलाईन प्रक्रियेचाही विचार करण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणतः दर्जा वाढचे 134 आणि नवीन शाळेचे 81 असे ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त आहेत तर ऑफलाइनचे 127 प्रस्ताव प्राप्त असल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली.
एका वर्षात राज्यात ८५ हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती पूर्ण; रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १९: राज्यात गेल्या एका वर्षात 85 हजार 363 उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्त्याही देण्यात आल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य विक्रम काळे यांनी अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेलार बोलत होते.
राज्यातील गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मधील पदांची भरती ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत होत असल्याचे सांगून माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आता राज्य शासनाने गट ‘क’ मधील काही पदांच्या भरतीचे अधिकारही एमपीएससीकडे दिले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाने 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने राज्यात 85 हजार पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आली आहे. तसेच एमपीएससी सदस्यांची रिक्त असेलेली ३ पदे भरण्याची कार्यवाहीही सुरू आहे. भरती प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारची बंदी नसून भरती प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शासनातील रिक्त पदांची माहिती एमपीएससीकडे वेळोवेळी सादर करून ही भरती प्रक्रिया राबवली जाते. आताही अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून त्याविषयी प्रक्रिया सुरु आहे. तसेच निवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीबाबतही शासन निर्णय घेऊन प्रक्रिया राबवत आहे. तसेच आतापर्यंत अनेक विभागांमध्ये रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियाही शासनाने मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे रिक्त पदांच्या भरतीबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील. तसेच नियमीत पदावर कंत्राटी भरती करण्याचे कोणतेही आदेश शासनाने निर्गमित केलेले नसून अशा प्रकारे भरती झाली असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर सर्व सोयीसुविधांची उभारणी सुरू – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. १९: नाशिक जिल्ह्यातील दुर्गम वाड्यांवर मुलभूत सोयींसह पायाभूत सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
अर्धा तास चर्चेदरम्यान सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोरे बोलत होते.
नाशिक जिल्ह्यातील लचकेवाडी, डोंगरवाडी, तोरणवाडी, गणेशनगर, खैरेवाडी, सिद्धीवाडी येथे वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे सांगून गोरे म्हणाले की, या सर्व वाड्यांमध्ये कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यादृष्टीने या वाड्यांच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आला आहे. तसेच या वाड्यांमध्ये अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून अंगणवाडीच्या इमारतींचे कामही सुरू आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा असून सांस्कृतिक सभागृहही मंजूर करण्यात आले आहे. वैतरणा नदीतून या वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली.
महामार्गांसह सर्वच मार्गांवर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
मुंबई, दि.१९: राज्यातील महामार्ग तसेच शहरातील हॉटेलसह पेट्रोलपंप याठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व चांगली स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर महिलांसाठी विशेष स्वच्छता गृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य चित्रा वाघ यांनी महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते.
मंत्री भोसले म्हणाले की, या स्वच्छतागृहांची देखभाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी नियोजन करण्यात येत आहे. ही स्वच्छतागृह सुलभ इंटरनॅशनलसारख्या एखाद्या संस्थेला देणे किंवा जवळच्या गावातीलच एखाद्या गटास त्याठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देणे आणि त्यांनी या स्वच्छतागृहाची देखभाल करणे असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच पेट्रोल पंपांच्या ठिकाणी व महामार्गावरील हॉटेल्समध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहांबाबत तपासणी करण्यात येईल महानगरपालिका, नगरपालिका यांच्या हद्दीत अशा प्रकारे स्वच्छता गृह उभारणे व त्याठिकाणी स्वच्छतेसह त्यांची देखभाल करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात येतील असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
***
SOURCE/CREDIT- Team DGIPR