मंदिरे ही जनसामान्यांची शक्तीस्थळे : माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
हेलसच्या श्रीकालिकादेवीच्या ४२ व्या वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरूवात
श्रीकालिकादेवी मंदिरासाठी सभामंडप देण्याची आमदार लोणीकर यांचा ग्वाही
परभणी : भारतीय परंपरेनुसार दररोज सकाळी कामावर किंवा इतर कोठेही जाण्यापूर्वी मंदिरात जाऊन देवदर्शन करण्याची प्रथा आहे, कारण मंदिर प्राचीन काळापासून जनसामान्यांचे ऊर्जा केंद्र होते आहे आणि यापुढे देखील राहील एखाद्या चार्जिंग स्टेशनवर गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपण गाडी चार्ज करतो अग्नि त्याचप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर आपली बॅटरी चार्ज होते व दिवसभर जे काम आपण हाती घेतला आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपणास ऊर्जा मिळते. भारतीय मंदिर हे केवळ उपासनेचे किंवा प्रार्थनेचे ठिकाण नसून वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एकत्र येण्याचे शक्ती स्थळ आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील हेलस येथे श्री कालिका देवी संस्थानच्या ४२ व्या वार्षिक यात्रोत्सव कार्यक्रमप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, मंदिराची स्थापत्य कला हेमाडपंथी बांधकाम ही खऱ्या अर्थाने प्राचीन काळातील विज्ञान आहे यामध्ये मूर्तीच्या आकारापासून ते मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंत प्रत्येक बाबीमध्ये एक ऊर्जा केंद्र तयार झालेले असते. प्राचीन काळातील मंदिरे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतात तोच वैज्ञानिक दृष्टिकोन आपण पुढे नेणे गरजेचे आहे असेही आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.
श्रीकालिकादेवी मंदिरासाठी सभामंडप : आमदार लोणीकर
हेलस गावाला खूप मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेला असून गावातील मंदिरे परिसरातील नागरिकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. मतदार संघातील ज्या ज्या गावांमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले त्या प्रत्येक गावात आपण सभामंडप मंजूर केला आहे श्री कलिंका देवी संस्थान च्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी देखील पुढील दोन ते तीन महिन्यात सभामंडप बांधकाम केले जाईल अशी घोषणा यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. ग्रामस्थ व कासार समाज बांधवांच्या वतीने वर्गणीच्या माध्यमातून लोकवाटा उपलब्ध करून देत मंदिरातील परिसरात पेव्हर ब्लॉक व संरक्षण भिंत बांधल्याबद्दल आमदार लोणीकरांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक देखील केले.
भारतीय संस्कृती टिकवण्याची जबाबदारी
यावेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, परकीय आक्रमण करताना भारतीयांची ऊर्जा स्थळे कोणती आहेत ही ओळखून जर भारतीय ऊर्जा स्थळे उद्ध्वस्त झाली तर भारतीय संस्कृती भारतीय विज्ञान आणि भारतीय नागरिक देखील उद्ध्वस्त होतील ही भावना लक्षात घेऊन आयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरासह मोठमोठ्या ऊर्जा केंद्र असणाऱ्या मंदिरांचा विध्वंस केला परिणामी भारतीय हिंदू ऊर्जा केंद्रांपासून दूर झाला परंतु पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पुढाकार घेऊन वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयासमोर राम मंदिराची बाजू मांडली व परिणामी आज जगातील सर्वात सुंदर अशे प्रभू श्रीरामचंद्राची मंदिर अयोध्येत उभे राहिले. भारतीय संस्कृती वर अनेक हल्ले झाले परंतु भारतीय संस्कृती संपुष्टात आली नाही ती संस्कृती टिकवण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे अशी प्रतिपादन देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
यावेळी श्रीकालिका देवी मंदिर संस्थानच्या ४२ व्या वार्षिक यात्रा उत्सव निमित्त आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. संस्थानच्या वतीने आमदार लोणीकर यांचा श्री कालिकादेवीची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, गोपाळ काटकर, संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर,सचिव बाबासाहेब हेलसकर, विलासराव वानरे, कैलासराव बोराडे, विलास घोडके, सरपंच नामदेव बनसोडे, बालासाहेब दहिभाते, भरत दहिभाते, कैलास खराबे, केशव खराबे, सुभाष दहिभाते, कृष्णा खराबे, भगवान खराबे, कैलास चव्हाण, रमेश वाघमारे, शंकरराव हेलसकर, बबनराव हेलसकर, वर्धमान कासार, ज्ञानेश्वर हेलसकर,पंढरीनाथ हेलसकर, गोपाळराव सासवडे, अभय महाराज कुंभकर्णे, नारायण कुंभकर्ण यांच्यासह मान्यवर पंचक्रोशीतील नागरिक, गावकरी व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.