पसायदान हेच मानवी जीवनाचे सार

पसायदान हेच मानवी जीवनाचे सार

श्रीगुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर : वसंत प्रतिष्ठानच्या पसायदान प्रवचनामालेला सुरूवात 

सेलू : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेले पसायदान हेच मानवी जीवनाचे सार आहे, असे प्रतिपादन श्रीगुरू श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने ‘पसायदान’ प्रवचनमालेला शनिवारी, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री साईबाबा मंदिरातील सभामंडपात सुरूवात झाली. प्रवचनमालेचे हे सहावे वर्ष आहे.

या प्रसंगी बोलताना चैतन्य महाराज म्हणाले की, पसायदानात मानवी जीवन मूल्ये व अलौकिकता याविषयी विवेचन केले आहे. जीवन कसे असावे व जीवन कसे जगावे याचे सखोल विवरण पसायदानात आहे. जीवनाची पूर्णता विषद करते ते पसायदान आहे. ज्या वेळी आपल्या अंतःकरण मधून अहंकार निवृत्त होतो तीच आपल्या जीवनाची परमात्म्याला दिलेली खरी पूर्णता आहे. जो जे जसे करील तसेच भरील हेच पसायदान आपल्याला सांगते. मानवी जीवन अलौकिक व्हावै हेच यात अभिप्रेत आहे.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून व ज्ञानेश्वर माउलींच्या तसेच सेलूभूषण स्व.वसंतराव खारकरमामा यांच्या प्रतिमेचे पूजन सद्गुरू चैतन्य महाराज यांनी केले. तर श्रीगुरुपूजन वसंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्योजक महेश खारकर व ॲड.उमेश खारकर यांनी केले.

यशवंतराव चारठाणकर यांच्या अवघे गर्जे पंढरपूर या अभंगवाणीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रास्ताविक आयोजक महेश खारकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगांवकर यांनी केले. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

१४ एप्रिलपर्यंत येथील श्री साईबाबा मंदिरात दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ यावेळेत प्रवचन आहे. शहरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वसंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खारकर व उमेश खारकर यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!