पिकविमा रक्कम देण्यास दिरंगाई नको

पिकविमा रक्कम देण्यास दिरंगाई नको

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विमा कंपन्यांना ताकीद

परभणी : मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईचा निधी अद्याप मिळाला नाही, त्यांना हा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. संबंधित विमा कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करु नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही, या अनुषंगाने बुधवारी, ७ मे रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार राहूल पाटील हे दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री.कुलकर्णी, आयसीआयसीआय लोंम्बार्ड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पिकविमा पोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांना तत्काळ मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करु नये. या वेळी आमदार श्री. विटेकर, श्री. गुट्टे, श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना नसैगिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानपोटी पिकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!