ईद मिलन कार्यक्रमातून सामाजिक सौहार्द : डाॅ.शरद ठाकर
जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे सेलूत कार्यक्रम
सेलू : आपला भारत देश विविध धर्म, भाषा, संस्कृतीने संपन्न देश आहे. या देशात सामाजिक एकता, एकात्मता , सौहार्द जपण्याचा कार्य सर्वांनीच केले पाहिजे. ईद मिलन सारखे कार्यक्रम सामाजिक सौहार्द जपण्यासाठी उपयोगी ठरतात, असे प्रतिपादन डाॅ.शरद ठाकर यांनी केले.
सेलू येथील जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे आयोजित ईद मिलन व मस्जिद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मदिना मस्जिद येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मौलाना तज्जमुल खान कासमी होते. प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, मौलाना खाजा साहब, अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष इंजिनिअर अनीस कुरेशी, उपाध्यक्ष शेख महेमुद, चंद्रशेख मुळावेकर, प्रा.शहाब उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून जमात-ए-इस्लामी हिंदचे संपर्क व संदेश विभागाचे महाराष्ट्र प्रभारी अब्दुल मुजीब देवणीकर यांनी इस्लाम, इस्लामची शिकवण, आजानचा अर्थ व उद्दिष्ट, मस्जिदचा संपूर्ण परिचय, नमाजची पध्दती, ईदचा महत्व व ईद मिलनाचा उद्दिष्ट या बाबत सविस्तर विवेचन केले. प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष शेख महेमुद यांनी केले. सूत्रसंचालन जमात ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष सिद्दिकी मोईन यांनी केले. या प्रसंगी उपस्थित बांधवांना दिव्य कुराण भेट देण्यात आले.