‘स्वराज’च्या यशाने भारावले शेतकरी कुटुंब

‘स्वराज’च्या यशाने भारावले शेतकरी कुटुंब

दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण, सेलूच्या नूतन विद्यालयाच्या लौकिकात भर 

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आणि सेलू येथील नूतन विद्यालयाचा विद्यार्थी स्वराज लक्ष्मण जाधव याने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन राज्यातील २११ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील ४० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल स्वराजच्या गावी, छत्रबोरगाव (ता.माजलगाव जि.बीड) येथे जाऊन शिक्षकांनी, पालकांचा पेढे भरवित यथोचित सन्मान केला. या आनंदाने जाधव कुटुंबिय भारावून गेले.

या वेळी मुलामुलींच्या शिक्षणाबद्दल जाधव कुटुंबियांमध्ये कमालीची जागरूकता दिसून आली. स्वराजचे आजोबा मुक्तीराम जाधव, वडील लक्ष्मण जाधव तसेच चुलते विठ्ठल जाधव, शरद जाधव, दत्तात्रय जाधव यांचा शिक्षकांनी यथोचित सन्मान केला. ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला. या वेळी शिक्षक बाबासाहेब हेलसकर, व्ही.एन. क्षीरसागर, एस. एन. क्षीरसागर, अनंतकुमार विश्वंभर, विजयेंद्र धापसे, बाळू बुधवंत आदींची उपस्थिती होती. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्य व रुग्णसेवा करण्याचे स्वप्न असून त्यासाठीची तयारी सुरू आहे, असे स्वराज याने सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, के. के. देशपांडे, शिक्षक आदींसह विविध स्तरांतून स्वराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“स्वराजच्या यशाने आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या मुलांनी ग्रामीण भागात राहूनसुद्धा जेवढी प्रगती साधली आहे. ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हे यश नूतन विद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, शिस्त, अभ्यास व प्रेरणादायी उपक्रम, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे. सोबतच या यशामध्ये त्याच्या आईचाही महत्वपूर्ण वाटा आहे. विशेष म्हणजे नूतन शाळा ही गुणात्मक शिक्षणासोबतच माणूस घडविण्याचे संस्कार देते. डॉक्टर होण्याचे स्वराजचे स्वप्न असून त्यासाठी तो तयारी करीत आहे.” – लक्ष्मण जाधव (वडील) छत्रबोरगाव ता.माजलगाव जि.बीड

 

“आपल्या पाल्याला नूतन विद्यालयात शिक्षण मिळावे. याकडे शहरासह आजुबाजुच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील पालकांचा ओढा आजही कायम आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या विविध शाळा तसेच महाविद्यालयात मुद्दामहून प्रवेश घेत असतात. स्वराज जाधव याचे दहावीच्या परीक्षेतील यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे; तसेच शाळा, संस्था आणि सेलूच्या लौकिकात भर घालणारे आहे. याचा सर्वांना आनंद आहे.” – संतोष पाटील, मुख्याध्यापक, नूतन विद्यालय, सेलू

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!