परभणीला अन्नप्रक्रिया उद्योगाचे हब करायचेय
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन, खरीप पीक परिंसंवाद व कृषि प्रदर्शनाला प्रतिसाद
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १८ मे रोजी आयोजित “खरीप पीक परिंसंवाद व कृषि प्रदर्शन” कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परभणी जिल्ह्यात १०० लघु व मध्यम उद्योग उभारण्याचा संकल्प केला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित करायचे आहे, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी नमूद केले.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.इन्द्र मणि होते. व्यासपीठावर माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट, दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, डॉ. खिजर बेग, डॉ. भगवान आसेवार, डॉ.राकेश अहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, प्रकाश देशमुख, दौलत चव्हाण, दादा लाड, चंद्रकांत वरपूडकर, सुधीर अग्रवाल आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष पुढाकार घेत विद्यापीठाने ५०० शेतकऱ्यांना दत्तक घेतले असून, त्यांची प्रगती साधण्यासाठी विज्ञानाधिष्ठित शेतीतंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीवर मात करत अधिक उत्पादन घेण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. परभणी जिल्ह्यात १०० लघु व मध्यम उद्योग उभारण्याचा संकल्प केला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित करायचे असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरूडॉ. इन्द्र मणि म्हणाले, की विद्यापीठ शेतकऱ्यांना ‘शेतकरी देव भव:’ मानून कार्य करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना नवतंत्रज्ञानाची जोड देणे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. चालू वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. महिलांच्या शेतीतील योगदानाची दखल घेत त्यांना आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण पुरवले जाणार आहे, असे सांगत विद्यापीठाच्या समर्पित कार्याचा आढावा दिला. माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट यांनी नमूद केले की, या विद्यापीठाने मला योग्य संस्कार आणि जीवनमूल्य दिले. त्यामुळेच मी विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करू शकलो. हे विद्यापीठ म्हणजे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, वैशालीताई घुगे, जयकिसन शिंदे, रवी दाभाडे, राहुल कव्हर, ज्ञानेश्वर देशमाने, जनार्दन सूर्यवंशी, प्रसाद इंगोले, योगकुमार श्रीखंडे या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.वीणा भालेराव, डॉ.अरुण गुट्टे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविक डॉ.राकेश अहिरे यांनी केले. मेळाव्यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्तारक, विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.