कचरा डेपोवरून सेलूचे वातावरण तापले
विविध प्रश्नांसह पालिकेतील प्रशासकीय बदलांचेही पडसाद
सेलू जि.परभणी : अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मराठवाड्यातील सेलू (जि.परभणी) येथील ‘ब’ दर्जाच्या नगरपालिकेचे प्रशासन आगामी निवडणुका जाहीर होण्या आधीच विविध कारणांमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. मार्केट यार्डमध्ये ऐन शहरातच कचरा डेपो केल्यावरून तसेच नुकत्याच झालेल्या पालिकेतील प्रशासकीय बदलांमुळे ऐन पावसाळ्यात सेलूतील सामाजिक आणि राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
मागील तीन-साडेतीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राज सुरू आहे. या काळात नागरी समस्येचा गंभीर प्रश्न सातत्याने ऐरणीवर आहे. या-ना-त्या कारणाने पालिका प्रशासन नेहमीच चर्चेत असते. सध्या मात्र, शहरातील नागरी समस्या आणि डंपिंग ग्राऊंडमुळे कचर्याचा प्रश्न धगधगता आहे. तर काही भागातील पाणीपुरवठ्यातील अनियमिततेवर नागरिकांत नाराजी आहे. अनेक भागात नव्या जुन्या अरूंद सिमेंट रस्त्याच्या आजूबाजूला मुरूम टाकला नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
तर काही नव्या वसाहतीत रस्तेच नसल्याने नागरिकांत संताप आहे. शहरातील काही मोजक्या वस्त्यांमध्येच विकास कामांचा धडाका सुरू आहे, तर अनेक मागास वस्त्यांमध्ये तसेच काही जुन्या वसाहतीत साध्या मूलभूत सुधारणाही केल्या जात नाहीत. यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच नव्याने झालेले मुख्य रस्ते आणि वसाहतीकडे जाणारे रस्ते जोडण्यात आले नाहीत. महामार्गावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताचा धोका कायमच आहे. मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. पालिका हद्दीतील मोकळ्या जागा गिळंकृत केल्या जात असल्याचा तसेच पालिकाहद्दीत अनाधिकृतरित्या ले-ऑउट टाकले गेल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.
सत्तासंघर्षाची चिन्हे
एका बाजूला विविध प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे सेलू पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा मागील काही वर्षांपासून ठपका ठेवला जात आहे. मात्र, दुसरीकडे नियमित मुख्याधिकारी युवराज पोळ यांनी नियुक्तीच्या अवघ्या सहा-सात महिन्यांतच घेतलेली दीर्घ रजा आणि त्यांच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तुकाराम कदम यांनी स्वीकारलेल्या पदभारानंतर मागील काही दिवसांपासून सेलूतील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. श्री.कदम यांनी प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून सेलू् पालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या मागील तीन दिवसांपूर्वीच विभागांतर्गत जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळेही वातावरण गरम आहे. मात्र, पालिका निवडणुकीच्या आधीच एकूणच पालिकेतील प्रशासकीय बदलांव्दारे आगामी काळात प्रस्थापित विरूद्ध सत्ताधारी असा सत्तासंघर्ष होण्याची चिन्हे असून, या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये कुरघोडी सुरू झाल्याची चर्चा आहे.
कचरा डेपोचा प्रश्न गंभीर
स्वच्छता अभियानात पुरस्काराने सन्मानित सेलू नगरपालिकेला स्वतःच्या मालकीच्या जागेत अजूनही डंपिंग ग्राऊंड करता आले नाही. कचरा डेपोसाठी मागील तीन वर्षांपासून एक कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, कचरा डेपोच्या जागेसाठी दरमहा ८० हजार रुपये मागील काळापासून खर्च होत आहेत, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रभारी मुख्याधिकारी कदम यांनीही कचरा डेपोची जुनी तयार जागा बदलून तीन वर्षांसाठी पुन्हा नव्याने जागा किरायाने घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण ती जागा कचरा टाकण्यायोग्य स्थितीत तयार नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून ऐन शहरातच बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये कचरा टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे आजुबाजुच्या वसाहती व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला नागरिकांतून तीव्र विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात कचरा डेपो, मूलभूत सोयीसुविधां पुरविण्यासोबतच प्रभारी सीओ कदम यांच्यासमोर पालिका कारभाराचेही मोठे आव्हान असणार आहे. याला ते नेमके कसे पेलतात, हाताळतात आणि सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपण पदभार स्वीकारला आहे. शिस्त व सुलभतेच्या दृष्टीने विविध विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कायम तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यामातून सेलू शहरातील स्वच्छ्ता, पाणीपुरवठा, आरोग्य, दीवाबत्ती आदी मूलभूत सोयीसुविधांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. पदभार घेण्यापूर्वीच नवीन डंपिंग ग्राऊंडची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ती जागा कचरा टाकण्यायोग्य करण्यात येत आहे. तोपर्यंतच बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये कचरा टाकण्याची तात्पुरती व्यवस्था आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या जोडरस्त्याचे अपूर्ण कामे पूर्ण करणे, पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, महामार्गावरील दुभाजकाचे वृक्षलागवड, प्रकाश योजनेने सुशोभीकरण आदींसह पालिका हद्दीतील ९४ मोकळ्या जागा विकसित करण्यावर भर दिला जाईल. कचरा डेपोसह नागरिकांचे मूलभत प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – तुकाराम कदम, प्रभारी मुख्याधिकारी, सेलू जि.परभणी