बोगस खत विक्री प्रकरणी शेतकऱ्यांचे आंदोलन
हिंगोली : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिकार्यांसाठी आणला नोटाचा हार
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यात बोगस खत विक्री करणाऱ्या खत विक्रेत्याचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करावा यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी, २० जूनरोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडून आंदोलन सुरु केले आहे.
हिंगोली शहरात गोदावरी कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी, १९ जून रोजी छापा टाकला. यामध्ये डीएपी खत बनावट असल्याच्या संशय आल्याने अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानाला सील ठोकले आहे. या शिवाय दुकानदार कृष्णा निलावार याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली आहे. या प्रकरणात आज क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण मते, गजानन काळे, बाळासाहेब बोंगाणे, ज्ञानेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, शेख रफीक, एकनाथ नागरे, गणेश मुंडे, प्रविण मानमोठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कृषी विभाग तसेच विक्रेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.
हिगोली जिल्ह्यात ईपॉस मशीनवर खताची विक्री होत नाही तसेच काही ठिकाणी बोगस खत विक्री केले जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार तयार करून आणला. बोगस खत विक्री करणाऱ्या खत विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करा तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी आणलेला नोटांचा हार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात घालण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र; पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले आहे. जो पर्यंत जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी चालविली आहे.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याची भूमिका घेतली होती मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले