एआयची चिंता नको; कौशल्ये बदला : डॉ.मनेश कोकरे

एआयची चिंता नको; कौशल्ये बदला : डॉ.मनेश कोकरे

सेलूतील ‘गुरूकृपा’च्या गुणवंतांचा सत्कार 

सेलू : नवीन शैक्षणिक धोरणामुळे अभियांत्रिकी शिक्षणातसुद्धा मोठे बदल झाले आहेत. सध्याच्या गुणांवर जी शाखा मिळते ती शाखा विद्यार्थ्यांनी घ्यावी. द्वितीय वर्षांपासून मायनर म्हणून अन्य शाखांचे शिक्षणही आता घेता येणार आहेत. फक्त शिकण्याची जिद्द ठेवा. करिअरच्या अनेक संधी आहेत. आणि एआयचीही चिंताही करू नका. फक्त आपली कौशल्ये बदलण्याची गरज आहे, असे मत नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे संचालक डॉ.मनेश कोकरे यांनी केले आहे.

सेलू येथील गुरुकृपा कोचिंग क्लासेस या शैक्षणिक संस्थेच्या २६ वा वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन मेळावा शनिवारी, २८ जून रोजी उत्साहात पार पडला.‌ अध्यक्षस्थानी बाजार समिती माजी संचालक अशोक खरात होते. याप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समिती महाराष्ट्रचे संचालक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक उफाडे, गुरूकृपाचे अध्यक्ष मनीष बोरगांवकर, संचालक साजिद खान, वैभव खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बारावीच्या सीईटी परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळविलेल्या अखिलेश कुमार, द्वितीय व्यंकटेश मोगरे, तृतीय नेहा राऊत या विद्यार्थ्यांसह ५० गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महेश पाटील म्हणाले की, अभियांत्रिकी शिक्षणात विविध ५०० वर शाखा उपलब्ध आहेत. पारंपरिक शाखांच्या मागे न लागता गुणांपेक्षा गुणवत्तेवर विश्वास ठेवा. निर्णय चांगला घ्या. तणावमुक्त वातावरणात भविष्यवेधी शिक्षणाला प्राधान्य द्या. अभ्यासात मेहनत, सातत्य राखा. पालकांनाही मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये. एजंटांच्या भानगडीत न पडता योग्य समुपदेशन घ्यावे. अशोक उफाडे यांनी मार्गदर्शन केले. गिरीश बोरगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरही विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!