आधी जीव घ्या, मगच जमीन !
‘शक्तीपीठ’ ला परभणीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
परभणी : परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “आधी आमचा जीव घ्या, मगच आमच्या जमिनी अधिग्रहित करा,” अशी आक्रमक भूमिका बाधितांनी घेतली आहे. पोखर्णी येथे शनिवारी, २८ जून रोजी पार पडलेल्या जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, परभणी जिल्ह्यातील शेतकरी याला कडाडून विरोध करत आहेत. बैठकीत शेतकऱ्यांनी एकमताने ठरवले की, ते सक्तीने जमीन अधिग्रहण करू देणार नाहीत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि मोजणी अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. या बैठकीला जिल्ह्यातील ३१ गावांमधील बाधित शेतकरी उपस्थित होते. १ जुलैपासून महामार्गाची प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार असून, ती उधळून लावण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली.या बैठकीला गोविंद घाटोळ, शांतीभूषण कच्छवे, विजयराव बेले, अमृतराव शिंदे, ॲड. माधुरी क्षीरसागर, सोनाली देशमुख, उर्मिला पवार, सतीशराव घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
३,८३९ शेतकऱ्यांच्या जमिनी होणार बाधित
शक्तीपीठ महामार्गासाठी परभणी जिल्ह्यात सुमारे १,५०० ते १,५२५ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यामुळे एकूण ३ हजार ८३९ शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून, यापैकी १,५०० ते २,००० शेतकऱ्यांनी या विरोधात आक्षेप नोंदवले आहेत. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.