Pravachan : परमात्मा प्राप्ती हाच उद्देश हवा : नामदेव महाराज ढवळे

Pravachan : परमार्थ करण्यापूर्वी परमात्मा प्राप्ती हाच उद्देश हवा : नामदेव महाराज ढवळे

सेलू : भगवंताने अर्जुनाला चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात, असे सांगतांना, वेगवेगळ्या उद्देशाने ही भक्ती केली जाते, असे सांगितले. त्यातील आर्त भक्त संकटे निवारणासाठी भगवंताची भक्ती करतात; पण भगवंत प्राप्ती हाच एकमेव उद्देश ठेवून भक्ती केली, तर संकटे आपोआप निवारण होतात, असा उपदेश भगवंतांनी केला आहे. त्यामुळे परमार्थ करण्यापूर्वी प्रत्येकाने परमात्मा प्राप्ती हाच एकमेव निश्चित उद्देश ठरविला पाहिजे, असे विष्णूदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांनी रविवारी (२१ ऑगस्ट) नमूद केले.

श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान व श्रीज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेब मंदिरातील सभागृहात श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचनमाला सुरू आहे. रविवारचे ( २१ ऑगस्ट) २४ वे पुष्प नामदेव महाराजांनी गुंफले. गीतेतील सातव्या अध्यायातील “चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥” हा १६ वा श्लोक त्यांनी घेतला. उदाहरणे, दाखले व प्रमाण देत अतिशय सोप्या भाषेत नामदेव महाराजांनी दैनंदिन जीवनाशी सांगड घालीत, या श्लोकाचे निरुपण केले.

माझी भक्ती तर प्रत्येकजण करतो, असे सांगतांना भगवंतांनी अर्थार्थी भक्त, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त अशा चार भक्तांचे वर्णन केले आहे. जे वेगवेगळ्या उद्देशाने भक्ती करत असतात. अर्थार्थी भक्तीत संसारातील पदार्थ प्राप्तीकरिता भगवंताची भक्ती केली जाते; परंतु सगळे काही प्रारब्धाधीन आहे. म्हणून अर्थार्थी भक्तीची गरज उरत नाही.‌ दुसरी आर्त भक्ती, ही संकटे निवारणासाठी केली जाते. परंतु जर देव प्राप्तीच्या उद्देशाने भक्ती केली, तर संकटांचे आपोआप निवारण होत राहाते. साधं देवाचं नामस्मरण करीत राहिले, तरी सहजच संकटं दूर पळतात. जिज्ञासू भक्तांत परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण झालेली असते, तर ज्ञानी ज्ञानी भक्ताला काहीही प्राप्तीची इच्छा राहात नाही. चेतना वा कळणे हे परमात्याचे स्वरूप आहे. विश्व हाच देव आहे. ज्या प्रमाणाने मातीपासून गाडगे निर्माण झाले असले, तरी गाडगे म्हणजे मातीच आहे. त्याचप्रमाणे परमात्यापासून विश्व निर्माण झालेले आहे. म्हणून विश्व हेच परमात्मा आहे. हा अनुभव ज्ञानी भक्ताला सहजपणे कळतो.

गावागावात सप्ताहापूर्वीच्या काळात गाथा भजन आणि ज्ञानेश्वरी प्रवचन असायचेच.‌ आता हा विषय राहिला नाही. गाथेचे महत्त्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडले. चोहोवेदांचे भावपूर्ण विश्लेषण गाथेमध्ये आहे. हे गाथा भजन आणि ज्ञानेश्वरी प्रवचन आता ऐकायला मिळणासे झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात श्रावण महिन्यात गेल्या अठरा वर्षांपासून ज्ञानेश्वरी प्रवचनाचा उपक्रम चालतोय. श्रोत्यांची गर्दी कमी होत नाही, तर वाढतेच आहे. याचे कारण निष्काम भावनेने चालणाऱ्या कार्याचा सतत उत्कर्ष होत राहतो.‌ हे जाणले पाहिजे.

 

हेही वाचा : Spiritual : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बी.के.डॉ.सचिन परब यांचे आज सेलूत प्रवचन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!