डाग डाग डागले : ‘त्या’ घटनेने सेलूच्या ‘रामराज्या’ला काळीमा 

डाग डाग डागले : ‘त्या’ घटनेने सेलूच्या ‘रामराज्या’ला काळीमा 

कडकडीत बंद पाळून व्यक्त केला तीव्र संताप, नराधमांना फाशीची जोरदार मागणी 

Authored By Shripad Kulkarni, Selu

सेलू : सांस्कृतिक शैक्षणिक व ऐतिहासिक सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचाराची घटना वेदनादायी ठरली. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, भर दिवसा दोन विकृत प्रवृत्तीचे तरुण शहरात येतात आणि कोवळ्या वयातील बहिण भावांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवतात, अपहरण आणि सामूहिक अत्याचार करतात, ही घटना परभणी जिल्ह्यातील सेलू शहराच्या ‘रामराज्या’ला काळीमा फासणारी आहे,असेच म्हणावे लागेल. शहरातील तमाम नागरिकांनी घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी, आठ सप्टेंबर रोजी सेलू शहर शंभर टक्के बंद ठेवून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

सेलू शहराला मराठवाड्याचे पुणे म्हणून संबोधले जाते. केवळ संबोधले जाते एवढेच नव्हे; तर शहरातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणारे तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे व्यवहार देखील तसेच आहेत. शहरात अध्यात्मिक व प्रबोधनाचे विषय घेऊन कायम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होत राहते. सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमाची, तर शहरात कायम रेलचेल असते. जात, धर्म, पंथ सर्व भेद विसरून शहरात कायम प्रेमाची लईलूट होत राहते. चुकीच्या गोष्टी व कृतीचे इथे समर्थन होत नाही. त्या उलट ज्ञान, विज्ञान, शिक्षण व सकारात्मक कार्याला इथे कायम प्रतिसाद मिळतो. शहराच्या इतिहासात अन्याय अत्याचारांच्या घटनांना थारा मिळत नाही; नव्हे अन्याय अत्याचार या शहराने अनुभवलेलाच नाही. राजकीय क्षेत्रातदेखील, राजकीय मतभेद सोडले, तर उदात्त भाव कायम ठेवून शहराची शांतता व एकोपा यासाठी प्रत्येक राजकीय व्यक्ती सतत काम करत राहते. असा अतिशय उदात्त व वैभवशाली वारसा लाभलेले सेलू शहर, अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामुळे सैरभर झाले आहे. प्रत्येक नागरिकांना त्या घटनेमुळे वेदना झाली आहे. सेलू हे एक कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबातील एका नाबलक मुलीवर सामूहिक अत्याचार झाला, ही घटना सेलूकरांसाठी सहनशीलतेच्या पलीकडची आहे.

रामराज्य

विकृत प्रवृत्तीच्या दोन नराधमांनी या अमानुष कृत्यासाठी जी दुचाकी वापरली होती, त्या दुचाकीच्या मागील नंबर प्लेटवरती चार अक्षरी ठळक शब्द रामराज्य हे आहेत. हे सूचक शब्दच बोलके ठरतात. सेलू शहरासारख्या रामराज्यात जाऊन अमानवी कृत्य करत आहोत, हेच यावरून सिद्ध होत आहे. रामराज्यात रावणी कृत्य म्हणता येणार नाही. रावण समर्थनीय नाहीच, मात्र या दोन विकृत मनोवृत्तीने जे अमानुष कृत्य केले आहे, जो अत्याचार केला आहे, असा अत्याचार रावणाने देखील केलेला नाही. त्यामुळे रामराज्या’च्या दुचाकी रथावर बसून आलेल्या त्या दोन अमानुष विकृत प्रवृत्तीने तमाम सेलूकरांचे हृदय पिळवटून टाकले. आणि सेलूसारख्या रामराज्याला काळीमा फासली आहे.

पोलिसांचा धाक

अत्याचारी व अमानवी कृत्य करणारे; तसेच गुंड व दहशत पसरविणारे या सर्वांसाठी पोलीस प्रशासनाचा धाक आवश्यक आहे. सेलू शहरातील तत्कालीन पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाचा धाक होता. तसा पोलीस प्रशासनाचा धाक त्यानंतर पाहायला मिळत नाही. रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहनं उभी करणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, शाळा, महाविद्यालय, क्लासेसच्या ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, दुचाकी व चार चाकीच्या नंबरप्लेटवर विविध नाव टाकून, स्वतःचा गाडी नंबर झाकून टाकणे, रेल्वेस्थानक, बस स्थानक, मुख्य बाजारपेठेत विनाकारण थांबून गर्दी करणे, अशा गोष्टींचे प्रमाण शहरात खूप वाढलेले आहे. महिला व मुलींना अनेक वेळा गर्दीतून वाट शोधावी लागते. टीका टवाळखोऱ्यांना निमूटपणे सहन करावे लागते. यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन, या चुकीच्या सर्व गोष्टी थांबवल्यास पोलिसांचा धाक निर्माण होईल व यातून चुकीच्या व शहराला काळीमा फासणाऱ्या घटना थांबवता येतील.

पथदिवे बंद

सेलू शहरात शिक्षणासाठी म्हणून बाहेरून आलेल्या मुला मुलींची संख्या मोठी आहे; तसेच शहरातील महिला देखील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे रात्री बाहेर पडतात. शालेय विद्यार्थी, महिला किमान यांची सुरक्षा गृहीत धरून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील सर्व रस्त्यावरील पथदिवे सुरू करावीत, जेणेकरून सुरक्षितता जाणवेल.

सीसीटीव्ही कॅमेरे

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. याचे मुख्य कारण म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज. ‘त्या’ दोन नराधमांच्या मध्ये बसलेले चिमुरडे बहिण भाऊ यांचे दुचाकी वरील अस्तित्व देखील जाणवत नव्हते. इतक्या कमी वयातील चिमुरडीवर अत्याचार करणारे, हे मानव असू शकत नाहीत.अशा अमानवी अत्याचारी लोकांना धाक बसवण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते व चौक, मोंढा, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासाठी पुढाकाराने जर हे काम करत नसेल, तर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेऊन निधी संकलन करून सेलू शहर कॅमेऱ्याच्या नजरेत ठेवावे.

वकील संघाची मागणी

त्या घटनेतील दोन आरोपींना कठोर शासन देण्याची मागणी सेलू शहरातील वकील संघाने उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून, बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत तात्काळ कार्यवाही करावी; तसेच प्रकरण लवकर निकाली काढावे व कठोरातील कठोर शिक्षा आरोपींना करावी.

सर्वपक्षीय प्रचंड मोर्चा

सेलू शहरातील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर व फाशीची शिक्षा झाली पाहिजे , यासाठी गुरूवारी प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस यंत्रणेने सदर घटनेतील गुन्हेगारांना तत्परतेने अटक केली आहे.सदरील गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकर शिक्षा झालीच पाहिजे, निर्भया कायद्याची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत.

विकृत प्रवृत्तीच्या दोन नराधमांनी या अमानुष कृत्यासाठी जी दुचाकी वापरली होती, त्या दुचाकीच्या मागील नंबर प्लेटवरती चार अक्षरी ठळक शब्द रामराज्य हे आहेत. हे सूचक शब्दच बोलके ठरतात. सेलू शहरासारख्या रामराज्यात जाऊन अमानवी कृत्य करत आहोत, हेच यावरून सिद्ध होत आहे. ‘त्या’ दोन अमानुष विकृत प्रवृत्तीने तमाम सेलूकरांचे हृदय पिळवटून टाकले. आणि सेलूसारख्या रामराज्याला काळीमा फासली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!