अमृतगाथा : परिसंवादातून वक्त्यांनी घातला स्वातंत्र्योत्तर वाटचालीच्या चिंतनाचा जागर
सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमाला, विविध वक्त्यांनी मांडले विचार
सेलू : येथील ख्यातनाम गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवी वर्षातील तिसरे पुष्प ‘स्वातंत्र्याची अमृत गाथा ‘ या विषयावरील परिसंवादाने गुंफले गेले. या वेळी विविध वक्त्यांनी सूत्रबद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने परिसंवादातून स्वातंत्र्योत्तर साडे सात दशकांच्या वाटचालीवर चिंतनाचा जागर घातला.
अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे होते. पत्रकार श्रीपाद कुलकर्णी-मसलेकर, सामाजिक कार्यकर्ता कांचन बाहेती, शिक्षक सुभाष मोहकरे, कीर्ती राऊत, प्राध्यापक हेमचंद्र हडसनकर, वीरेश कडगे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, डॉ.गंगाधर गळगे, नारायण ईक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्याची अमृतगाथा परिसंवादा ७५ वर्षाच्या वाटचालीची विभागणी साधारणपणे दहा दहा वर्षाच्या सात दशकात करण्यात आली होती. सहभागी वक्त्यांनी एकेका दशकातील राजकीय, सामाजिक, आर्थिक शैक्षणिक, कला संस्कृती आदी क्षेत्रातील घडामोडींची सकारात्मक मांडणी करून, आलेल्या अडचणीवर मात करीत देशाने कशी प्रगती केली याची सोदाहरण माहिती दिली. त्यात कटू गोड, दुःखाच्या आनंदाच्या, बन्या- वाईट घटनांचा समावेश होता. वक्ते पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्राशी संबंधित होते. सर्वांनी अभ्यासपूर्ण मांडणी करीत, परिसंवादात रंगत आणली.
पत्रकार श्रीपाद कुलकर्णी-मसलेकर यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात डॉ. आंबेडकरांनी केलेली राज्यघटनेची निर्मिती आणि सरदार पटेल यांनी केलेल्या ५६२ संस्थानांचे संघराज्यात विलीनीकरण करण्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. तर सामाजिक कार्यकर्त्या कांचन बाहेती यांनी स्वातंत्र्यानंतरच्या दुसन्या दशकात पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारत देश हरितक्रांती व धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना चीनच्या आक्रमणामुळे आलेल्या व्यत्ययाबद्दल खंत व्यक्त केली. तिसऱ्या दशकातील घटनांचा वेध घेताना शिक्षक सुभाष मोहकरे यांनी बांगलादेशची निर्मिती आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीवर श्रोत्यांशी संवाद साधला. शिक्षिका कीर्ती राऊत यांनी चौथ्या दशकाचा आढावा घेताना ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड म्हणून झालेल्या इंदिरा गांधीच्या हत्तेचा उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतरच्या पाचव्या दशकातील परिस्थितीचे विवेचन करताना प्राध्यापक हेमचंद्र हडसनकर यांनी आर्थिक सुधारणासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांनी स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेचा परामर्श घेतला. डॉ.भाग्यश्री धामणगावकर यांनी स्वातंत्र्यानंतरच्या सहाव्या दशकात घडलेले गोधा हत्याकांड आणि चंद्रयानच्या पहिल्या यशस्वी प्रक्षेपणाची रोमांचकारी माहिती दिली. सातव्या विद्यमान परिस्थितील दशकावर बोलताना, शिक्षक वीरेश कडगे यांनी भ्रष्टाचार विरोधात अण्णा हजारे यांचे उपोषण,आम आदमी पक्षाचा जन्म, भाजपाचा झंजावात, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, कोरोनाचा उद्रेक आदि घटनांवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात गजानन वाघमारे म्हणाले, ” मराठवाडा मुक्ती संग्रामात, सेलूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वस्वाचे योगदान देऊन स्वातंत्र्यासाठी इतिहास घडविला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सेलू शहराने सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात इतिहास घडवीत स्वातंत्र्याचा विधायक कार्यासाठी उपयोग करून घेतला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
सूत्रसंचालन संयोजक प्रा. डॉ. गंगाधर गळगे यांनी केले, तर नारायण इक्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष एन.वाय. सोळंके, सचिव गिरीश लोडाया तथा अन्य पदाधिकारी तसेच चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी, आनंद बाहेती, प्रवीण माणकेश्वर, संजय वाघ, कल्याण पवार, राजश्री शिवणकर, सविता कासट, मेघना चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
अध्यक्षीय भाषणात गजानन वाघमारे म्हणाले, ” मराठवाडा मुक्ती संग्रामात, सेलूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वस्वाचे योगदान देऊन स्वातंत्र्यासाठी इतिहास घडविला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सेलू शहराने सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात इतिहास घडवीत स्वातंत्र्याचा विधायक कार्यासाठी उपयोग करून घेतला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”