दिवाळी पाडवा : चैतन्यदायी सुरांनी सेलूकरांची पहाट प्रसन्न

दिवाळी पाडवा : चैतन्यदायी सुरांनी सेलूकरांची पहाट प्रसन्न

श्री बाबासाहेब मंदिरात रंगली ‘स्वरसाधना’ ची सुरेल मैफल, अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेचा उपक्रम, रसिकांची मोठी उपस्थिती 

दिवाळी पाडवा : चैतन्यदायी सुरांनी सेलूकरांची पहाट प्रसन्न

बाबासाहेब हेलसकर 

सेलू जि.परभणी : औरंगाबाद येथील ‘स्वरसाधना’च्या गायकांनी गायलेल्या घनश्याम सुंदरा श्रीधरा… मोगरा फुलला…तुझे गीत गाण्यासाठी…माय भवानी तुझे लेकरू…आदी एकाहून एक सरस, भाव आणि भक्तीगीतांच्या सुरेल रचनांनी बुधवारी (२६ ऑक्टोबर) सेलूकरांची सकाळ चैतन्यदायी सुरांत न्हाऊन निघाली. प्रसन्न झाली.

सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराच्या सभागृहात कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वरसाधना, औरंगाबाद प्रस्तुत ‘पहाट स्वरांची’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, संयोजक अशोक काकडे, के.बा.विद्यालयाचे सचिव महेश खारकर, किशोर जोशी, सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

सेलूच्या भूमीकन्या, भूमीसून वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी गायलेल्या घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या भूपाळीने कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात झाली.अनघा काळे यांनी संत ज्ञानेश्वरांची मोगरा फुलला, मोगरा फुलला ही रचना गायली. वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी माय भवानी तुझे लेकरू, वैभव पांडे यांनी तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे…आदी गीते सादर करून मैफलीत रंग भरला. रसिकांची उत्स्फूर्त दाद आणि श्रीकांत उमरीकर यांच्या दिलखुलास बहारदार निवेदनाने मैफल खुलत गेली. उत्तरार्धात वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले…अनघा काळे यांनी विष्णूदासांची माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, वैभव पांडे व वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे भावगीत सादर केले. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही रचना वैभव पांडे यांनी, तर ऐरणीच्या देवा तुझी ठिणगी ठिणगी वाहू दे…हे गीत वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी गायले. अनघा काळे यांनी धरिला पंढरीचा चोर, ऋचा मसलेकर यांनी खेळ मांडियेला वाळवंटी, वैभव पांडे यांनी ‘आकाशी झेप घे पाखरा’ हे गीत सादर केले. शुक्र तारा मंद वारा हे भावगीत वैभव पांडे व वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी सादर केले. संत तुकाराम महाराजांच्या विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी गायलेल्या रचनेने मैफलीची सांगता झाली. जागतिक भावगीत स्पर्धा विजेत्या वर्षा जोशी-दिग्रसकर, वैभव पांडे, अनघा काळे गायकीला शांतीभूषण चारठाणकर, जगदीश व्यवहारे, विनोद वाव्हळ, राजू तायडे यांनी साथसंगत साथ केली. श्रीकांत उमरीकर यांनी केलेल्या निवेदनाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

या वेळी परमवीर अब्दुल हमीद पुरस्कारप्राप्त उद्योजक रामप्रसाद घोडके, महेश भूषण पुरस्काराबद्दल उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, विशेष सेवा पुरस्कारप्राप्त महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा, पत्रकार नारायण पाटील, प्रा.नागेश कान्हेकर, गंगाधर कान्हेकर आदींचा; तसेच गायिका वर्षा जोशी-दिग्रसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, गोविंदभाऊ जोशी, नंदकिशोर बाहेती, यशवंत चारठाणकर, ॲड.अनुप निकम, निर्मला लिपणे, शिलाताई काकडे, गंगाधर कान्हेकर, संतोष कुलकर्णी, अशोक अंभोरे, अशोक उफाडे, रविंद्र मुळावेकर, गिरीश लोडाया, प्रभाकर शिंदे, मोहन खापरखुंटीकर, प्रसाद खारकर, श्रीपाद कुलकर्णी, सुधीर मंडलिक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक श्रोत्यांची कार्यक्रमाला मोठी उपस्थिती होती.

या वेळी परमवीर अब्दुल हमीद पुरस्कारप्राप्त उद्योजक रामप्रसाद घोडके, महेश भूषण पुरस्काराबद्दल उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, विशेष सेवा पुरस्कारप्राप्त महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा, पत्रकार नारायण पाटील, प्रा.नागेश कान्हेकर, गंगाधर कान्हेकर आदींचा; तसेच गायिका वर्षा जोशी-दिग्रसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!