सशस्त्र दरोडा : सेलू शहर भीतीच्या सावटाखाली; सतर्कतेची गरज
विविध कॉलनीतील नागरी दक्षता पथकांच्या गस्ती सक्रिय करण्याची आवश्यकता
सेलू जि.परभणी : बुधवारी, २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सेलू शहरातील सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर दिवाळीच्या उत्साहावर भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान, शहरवासीयांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
सेलूतील रेल्वे गुड्स परिसरातील रहिवासी कर सल्लागार चंद्रमोगलेश्वर नागुल यांच्या घरी बुधवारी मध्यरात्रीनंतर सात ते आठ सशस्त्र चोरट्यांंनी एका जेष्ठ महिलेला धारदार शस्त्राचा धाक दाखवून, 14 तोळे सोने व रोख 60 हजार रुपयांवर डल्ला मारला. रेल्वे गुड्स ही वस्ती मारोती नगर व रेल्वे स्थानक परिसराला लागून आहे. चंद्रमोगलेश्वर नागुल हे दिवाळीसाठी त्यांच्या गावी गेरपल्ली (करीम नगर, हैद्राबाद) येथे गेले होते. त्यांची आई शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला गेलेली होती. भाऊ गुरुशंकर व आत्या मोगलबाई हे दोघेजणच घरी होते. मोगलाबाईचे पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे त्या खालच्या मजल्यावर होत्या, तर गुरुशंकर वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेला होता. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास तोंडाला मास्क बांधलेले सात ते आठ सशस्त्र चोरांनी समोरील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याचवेळी मोगलाबाई यांना जाग आली. भयभीत झालेल्या मोगलाबाई यांनी गुरुशंकरला आवाज दिला. परंतु; चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून ओरडलीस, तर तुला व वर जो आहे, त्याला देखील मारून टाकण्याची धमकी दिली. त्यांनी खालच्या खोलीतील व वरच्या मजल्यावरील खोलीतील कपाट तोडून 14 तोळे सोन्याचे दागीने व 60 हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. गुरुशंकरला काहीच खबर लागली नाही. सकाळी उठल्यावर गुरुशंकरच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्याने त्याच्या भावाला व पोलिसांना ही खबर दिली. लगेच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला. घटनास्थळी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. प्रभारी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाची सूत्रे हलवली आहेत. दरम्यान या घटनेनंतर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेलू पोलिस सातत्याने गस्तीवर असतानाही सशस्त्र दरोडा पडला. सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे शेजारीपाजारी दोन-चार दिवस नातेवाईक, मित्र परिवाराला भेटण्यासाठी घराबाहेर पडतात. काही नागरिक नियोजित कामाने शहरापासून दूर असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह नागरिकांनीही सर्तक राहण्याची गरज निर्माण झाली असून, विविध वस्त्यांमधील नागरिक दक्षता पथके नव्याने सुरू करणे आवश्यक बनले आहे, असे सांगितले जात आहे.