कोल्हा-परभणी : रस्त्याची लागली वाट; पुन्हा खड्डेच खड्डे, मुख्यमंत्र्यांना साकडे 

कोल्हा-परभणी : रस्त्याची लागली वाट; पुन्हा खड्डेच खड्डे, मुख्यमंत्र्यांना साकडे

सेलू तालुका दबाव गटाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन 

बाबासाहेब हेलसकर | सेलू

सेलू, जि.परभणी, १० डिसेंबर : कोल्हा ते परभणी रस्त्याची पुन्हाएकदा वाट लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अल्टिमेटमनंतर काही ठिकाणी गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर फसवे खड्डे जिवघेणे ठरणारे आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी सेलू तालुका दबाव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठ डिसेंबर रोजी निवेदन धाडले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की कोल्हा-ताडबोरगाव-परभणी हा महामार्ग रस्त्याचा भाग आहे. त्याचे काम चालू आहे. मध्यंतरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्यावर लिपापोती करण्यात आली मात्र; अत्यंत थातूरमातूर काम करण्यात आले. झालेले काम हो अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे स्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अत्यंत धोकादायक आहेत. गेल्या तीन-चार वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे. सामान्य जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. वाहने खराब होतात ते वेगळे. केवळ ठेकेदार व अधिकाऱ्याचे मनमानी सोयीसाठी, मनमानी पद्धतीने कामे चालू आहेत. जनतेच्या पैशाचा राजरोस गैरवापर चालू आहे. सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. नाहक वाहनधारकांचे बळी जातात. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे. कोल्हा ते परभणी या महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. अधिकाऱ्यामार्फत या रस्त्याची पाहणी करून गुण नियंत्रण करण्यात यावे. दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, ॲड.देवराव दळवे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, योगेश सुर्यवंशी, रौफ भाई, मुकुंद टेकाळे, दिलीप मगर, विलास केवारे, विलास रोडगे, रामचंद्र आढाव, दत्तराव कांगणे, सतिश काकडे, अंबादास काकडे, अजित मंडलिक केशव डोईफोडे, दत्ता गायके, गुलाब पौळ, नारायण पवार, भुजबळ, उध्दव सोळंके, उत्तम गवारे, विजय मंत्री आदींच्या सह्या आहेत.

रायपूर-हातनूर रस्ता काम रखडले

सेलू तालुक्यातील रायपूर- हातनूर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. या मागणीचे निवेदन अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,परभणी आणि सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने देण्यात आले आहे.

तालुक्यातील रायपूर- हातनूर या रस्त्याच्या कामाची सुरुवात डिसेंबर- २०२१ मध्ये झाली आहे. मात्र; आता वर्ष संपत आले तरी अद्याप रस्त्याचे पूर्ण झालेले नाही. त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची त्यामुळे अत्यंत गैरसोय होत आहे. त्या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे वाहने खराब होत आहेत. नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. नाहक शारीरिक व्याधी होत आहे. या रस्त्याचे जे चार-पाच किलोमीटरचे काम असेल. त्यासाठी एक वर्ष कालावधी लागावा, हे न कळणारे कोडे आहे. तालुक्यातील रस्त्यांची कामे ही काय, ठेकेदारांच्या सोयीनेच चालत आहेत काय ? सार्वजनिक बांधकाम विभागाचे यावर नियंत्रण नाही का ? ठेकेदार पैसे उचलून बसतात, मग कामे पूर्ण करण्यास टाळाटाळ करतात. निकृष्ट दर्जाची कामे करतात. अधिकारी वर्गाची दर्जा बाबतीत देखरेख नसतेच मग सहाच महिन्यात रस्ता खड्डेमय होतो. जनतेच्या हिताकडे यांना लक्ष देण्यास वेळ नसतो. तरी रायपुर – हातनूर रस्त्यांसह तालुक्यातील चालू असलेले सर्व रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कामे गुत्तेदारांच्या सोयीनेच ?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे यावर नियंत्रण नाही का ? ठेकेदार पैसे उचलून बसतात, मग कामे पूर्ण करण्यास टाळाटाळ करतात. निकृष्ट दर्जाची कामे करतात. अधिकारी वर्गाची दर्जा बाबतीत देखरेख नसतेच मग सहाच महिन्यात रस्ता खड्डेमय होतो.कामे गुत्तेदारांच्या सोयीनेच, असा सवाल सेलू तालुका दबाव गटाने यानिमित्ताने उपस्थित केला आहे.  

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!