निष्काळजीपणाचा बळी : एल ॲण्ड टी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पाथरीतील अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर
राष्ट्रीय महामार्गावर ‘ना ब्रेकर ना सिग्नल’, मृतांच्या नातेवाइकांचा तासभर रास्तारोको
पाथरी जि.परभणी (शेख अन्वर) : मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार १३ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथील मोंढ्या समोरील बीड -परभणी हायवेवर भरधाव जाणाऱ्या क्रुझर गाडीने खाजगी मोटरसायकलद्वारे नखाते पेट्रोल पंप जवळील इंदिरानगर येथे घरी जाणारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालेद शेख यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. आहे. यामध्ये शेख मोहम्मद यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर शेख खालेद गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शेख खालेद यांना माजी नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी यांच्या गाडीने सह्याद्री हॉस्पिटल परभणी व यानंतर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या अपघातात आंबेडकरी चळवळीमध्ये तसेच टिपू सुलतान जयंती मध्ये हिरहिरीने भाग घेणारे शेख मोहम्मद अपघातात जागीच ठार झाले आहेत. भरधाव वेगाने अपघातास कारणीभूत क्रुझर गाडी पाथरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
अपघातानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला या त्या बीड परभणी हायवेवर ना सिग्नल, ना ब्रेकर तसेच कोणतेही ट्राफिकचे पोलीस अधिकारी नेमण्यात आलेले नाहीत. यामुळे पाथरी शहरातील नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन विभागाला आणखी किती निष्पाप लोकांचे बळी हवे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मृत मोहम्मद शेख यांच्या संतप्त कुटुंबियांनी व पाथरीतील नागरिकांनी १४ डिसेंबर रोजी तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर तरी रस्ते निर्माण कंपनी एल अँड टी चे अभियंता व कर्मचारी यांना जाग येईल का? अन्यथा निष्पाप लोकांचा जाणून-बुजून बळी घेणाऱ्या या अधिकाऱ्यावर ३०२ चा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.