श्रीराम जन्मोत्सव : कीर्तनात सेलूकर दंग; गुरूवारी शोभायात्रा, पालखी सोहळा, नगरभोजन

श्रीराम जन्मोत्सव : कीर्तनात सेलूकर दंग; गुरूवारी शोभायात्रा, पालखी सोहळा, नगरभोजन

श्रीमद् भागवत कथा, साई कीर्तन महोत्सवाला मोठा प्रतिसाद

परभणी : गुढीपाडवा व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा मंदिरात २३ मार्चपासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा, तसेच कीर्तन महोत्सवाला मोठा प्रतिसाद आहे. नामवंत कीर्तनकारांच्या सेवेतून हरिनामाच्या संकीर्तनात सेलूकर दंग झाले आहेत.

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने आयोजित या महोत्सवाचा गुरुवारी (३० मार्च) चालणार समारोप आहे.  विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. २३ मार्चपासून नंदकिशोर पुराणिक गोंदीकर महाराज यांची दुपारी एक ते पाच या वेळेत संगीतमय श्रीमद् भागवत कथा होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून रोज रात्री वाजता ज्ञानेश्वर महाराज तांबे, प्रकाश महाराज साठे, पल्लवी महाराज दौड, माऊली महाराज खडकवाडीकर यांच्या कीर्तनाला श्रोत्यांनी गर्दी केली. मुक्ता व शिवानी‌ चाळक यांची कीर्तन जुगलबंदी रंगली होती.संतोष महाराज वनवे यांचे मंगळवारी (२८ मार्च) कीर्तन झाले. बुधवारी, २९ मार्च रोजी जयश्री तिकांडे यांचे रात्री आठ वाजता कीर्तन आहे.

सोमवारी माऊली महाराज खडकवाडीकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘भक्त समागमे सर्वभावे हरि, सर्व काम करी न सांगता’ या अभंगावर कीर्तन पुष्प गुंफले. अन्नधान्य उत्पादनातून देशाला जगविणारे आणि सीमेवर अहोरात्र पाहारा देऊन देशाचे सरंक्षण करीत, तुम्हा-आम्हाला शत्रूंपासून वाचविणारे जवानही मोठ्या संख्येने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातीलच आहेत, असे मत या वेळी माऊली महाराजांनी व्यक्त केले. महाराज म्हणाले, की ऐहिक जगाचा सबंध तोडल्याशिवाय भगवंताशी एकरुप होता येत नाही. कर्म चांगले असेल, तर देव न सांगता कामाला येतो, असे सांगून क्रांतिकारी संत शिरोमणी नामदेव महाराज, संत जनाबाई, तसेच संत श्री साईबाबा अशी परभणी जिल्ह्याला संतांची मोठी परंपरा आहे, असे महाराजांनी सांगितले. मुलींची संख्या कमी झाल्याने मुलांच्या लग्नाची मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. यातून फसवणूक, आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मुलगी देतांना, मुलाच्या कुटुंबांच्या परिस्थितीपेक्षा त्यांच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे सांगून देशासाठीच जगा आणि देशासाठीच देह कारणी लावा, असे आवाहन माऊली महाराजांनी कीर्तनातून केले. संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, साईराज बोराडे यांनी मान्यवरांचे यांनी स्वागत केले. मिलिंद सावंत यांनी आभार मानले.

गुरूवारी नगरभोजन; २३ वर्षाची परंपरा

गेल्या २३ वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त साईबाबा मंदिर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेश बोराडे मित्रमंडळ व सेलूतील नागरिकांच्या पुढाकाराने शहरात नगरभोजनाची परंपरा आहे. शहरातील सर्व नागरिक नगरभोजनामध्ये आपापल्यापरीने योगदान देतात. महिला भगिनी घरून पोळ्या करून आणून देतात. यासाठी पीठाच्या पाच-पाच किलोच्या बॅग वाटपाला मंगळवारी (२८ मार्च) सुरुवात  झाली.‌ गुरूवारी दहा वाजेपर्यंत पोळ्या मंदिरात महिलांनी पोहोचती करव्यात अथवा संयोजन समिती घरपोच येऊन पोळ्या एकत्र करतील. बुधवारी (२९ मार्च) बेल वृक्षाचे रोपांचे तसेच कुबरेश्वरधाम सिहौर येथील प्रसादरूपी सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप आहे. गुरुवारी (३० मार्च) शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. श्रीराम जन्मोत्सवानंतर नगरभोजन महाप्रसाद आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शोभायात्रा, पालखी मिरवणूक

श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त सेलूकरांच्या वतीने सकाळी आठ व दुपारी चार वाजता शोभायात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. श्री रोकडिया हनुमान मंदिर, मोंढा येथे समारोप होईल. शोभायात्रेत प्रभु श्रीरामची भव्य मूर्ती, उज्जैन महाकाल येथील प्रसिद्ध झांजपथक, हरियाणा येथील रूद्ररुपी बजरंगबलीचा सजीव देखावा, उज्जैन येथील बाबा महाकाल श्रृंगाररूपी शिवलिंग दर्शन, रणरागिणी ध्वज पथक, मुलींचे लेझीम पथक, आठ फुटी नंदी महाराजांवर विराजमान भगवान श्री शिवशंकर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार, कृष्ण अर्जुन गीता उपदेश, भगवान परशुराम सजीव देखावा, श्री विठ्ठल रुक्मीनी सजीव देखावा, वारकरी मंडळी, वानरसेना, महिला भजनी मंडळ, थोर महापुरूषांचे सजीव देखावा, घोडे, उंट व शिवकालीन खेळांचा देखावा आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. दुपारी चार वाजता श्रीरामांची भव्य मिरवणूक व पालखी सोहळा आहे. मिरवणूक व शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सेलू शहरातील सर्व नागरिक नगरभोजनामध्ये आपापल्यापरीने योगदान देतात. महिला भगिनी घरून पोळ्या करून आणून देतात. यासाठी पीठाच्या पाच-पाच किलोच्या बॅग वाटपाला मंगळवारी (२८ मार्च) सुरुवात  झाली.‌ गुरूवारी दहा वाजेपर्यंत पोळ्या मंदिरात महिलांनी पोहोचती करव्यात अथवा संयोजन समिती घरपोच येऊन पोळ्या एकत्र करतील. बुधवारी (२९ मार्च) बेल वृक्षाचे रोपांचे तसेच कुबरेश्वरधाम सिहौर येथील प्रसादरूपी सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप आहे.  गुरुवारी (३० मार्च) शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. श्रीराम जन्मोत्सवानंतर नगरभोजन महाप्रसाद आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!