साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा जागर घाला : नामदेव सूर्यवंशी; शारदा महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या संयुक्त सहभागाने उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्यामसुंदर वाघमारे, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक नामदेवराव सूर्यवंशी, मुख्याध्यापक नितीन जैस्वाल उपस्थित होते. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.संतोष नाकाडे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.उज्ज्वला जगताप यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी म्हणाले, की महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन कार्य केले तर राष्ट्र समृध्द व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे सर्वांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा जागर करून राष्ट्र आणखी समृद्ध करावे असे मत प्रतिपादन केले. त्यानंतर मुख्याध्यापक नितीन जैस्वाल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा व कार्याचा सविस्तर परिचय करून दिला.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. श्यामसुंदर वाघमारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र ग्रंथावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा जीवनपट पाहिला, तर अण्णाभाऊंच्या कार्याची महती जगभर कशी पसरली आहे हे लक्षात येते. त्यामुळे लोकशाहीरांच्या कार्य कर्तृत्वाचा वसा घेऊन मार्गक्रमण करावे, असे मत प्रतिपादन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन खडके यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सुनिल बल्लाळ यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.