शिक्षण, आयुष्य जगण्याचे भान जागविते : डॉ.दिगंबर नेटके; सेलूतील नूतन महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण
सेलू : शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. शिकलेली मूल्ये आचरणात आणून प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केले पाहिजेत. आयुष्य जगण्याचे भान जागविण्याचे सामर्थ्य शिक्षणातून निर्माण होत असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके यांनी केले.
नूतन महाविद्यालयात मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी आयोजित पदवी वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नेटके बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, डॉ.राजाराम झोडगे, परीक्षा विभागाचे सहाय्यक कुलसचिव मोहरीर, डॉ.निर्मला पद्मावत, प्राध्यापक पटारे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.दिगंबर नेटके म्हणाले, की मिळविलेली पदवी ही समाजात कसे जगावे, याचे भान देत असते. आजवर समाजातून खूप गोष्टी घेतलेल्या असतात. आता देण्याची वेळ आलेली आहे. नाते सांभाळून संवेदना जपत संवादी होणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे.” अध्यक्षीय समारोपात डॉ.विनायक यांनी पदवीधरांनी जबाबदारी वागले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील १९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ध्वज घेऊन प्रमुख पाहुणे, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी अशी रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक डॉ.राजाराम झोडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.अर्चना पत्की यांनी केले. डॉ.प्रवीण खरात यांनी आभार मानले.