स्वयें श्रीराम प्रभु ऐकती…गीत रामायणामध्ये सेलूकर तल्लीन
महेशनगर महिला मंडळ, श्रीसाईबाबा मंदिर संस्थानचा उपक्रम
सेलू (जि.परभणी) : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सोमवारी, १३ नोव्हेंबररोजी सायंकाळी श्रीसाईबाबा मंदिरात गीत रामायण हा संगीतमय कार्यक्रम झाला. यामध्ये नांदेडचे पंडित संजय जोशी आणि सेलूच्या भूमीकन्या छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा जोशी-दिग्रसकर यांनी गायलेल्या गीत रामायणातील अविट गोडीच्या आणि मनाचा ठाव घेणार्या गीतांमध्ये सेलूतील रसिक श्रोते तल्लीन होऊन गेले. संजय जोशी यांनी सादर केलेल्या गीत रामायणाचा हा १०५५ वा कार्यक्रम होता. श्रीसाईबाबा मंदिर संस्थान आणि महेशनगर महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. प्रारंभी गोविंदभाऊ जोशी, डॉ.रामराव रोडगे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, दत्तराव पावडे, किशोर जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी नवोदित गायक ॲड.अनिरुद्ध जोशी यांनी ‘शुक्रतारा’मधील स्वरगंगेच्या काठावरती तसेच सांज ढले गगन तले ही गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर मराठी मनाचा ठाव घेणार्या आणि प्रभु श्रीरामचंद्राचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या ‘गीत रामायणा’तील निवडक गीते पं.संजय जोशी व वर्षा जोशी यांनी सादर केली. पं.संजय जोशी यांनी गायलेल्या ‘स्वयें श्रीराम प्रभु ऐकती’ या गीताने सुरुवात झाली. त्यानंतर दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो, ज्येष्ठ तुझा पुत्र देई दशरथा, स्वयंवर झाले सीतेचे, माता न तू वैरिणी, दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, नको आसू ढाळू आता पूस लोचनास’ आदी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. तबल्यावर डॉ.जगदीश देशमुख, गजानन धुमाळ, हार्मोनियम शांतीभूषण चारठाणकर, तालवाद्य ललित चोबे, संगीत संयोजन, डॉ.प्रमोद देशपांडे साथसंगत केली. सूत्रसंचालन स्वप्निता ढवळे यांनी केले. श्रीकांत उमरीकर यांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सेलूभूषण जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, डॉ.सुनील कुलकर्णी, महेश खारकर, अशोक कासार आदींसह श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. महेशनगर महिला मंडळाच्या संपदा राजूरकर, उर्मिला बोराडे, अर्चना राठी, ऋचिता गुप्ता, अपर्णा कुलकर्णी, उज्ज्वला मालाणी, अनिता कुलकर्णी, स्वप्निता ढवळे आदींसह माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळ, गंगाधर कान्हेकर, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी व संयोजन समितीने पुढाकार घेतला.
नवोदित गायक ॲड.अनिरुद्ध जोशी यांनी ‘शुक्रतारा’मधील स्वरगंगेच्या काठावरती तसेच सांज ढले गगन तले ही गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मराठी मनाचा ठाव घेणार्या आणि प्रभु श्रीरामचंद्राचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या ‘गीत रामायणा’तील निवडक गीते सादर करून पं.संजय जोशी व वर्षा जोशी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.