शेतीपूरक व्यवसायांसाठी ‘बळीराजा’चा पुढाकार; समितीच्या रायपूर बैठकीत विविध निर्णय
सेलूतील गावागावात दहा शेतकऱ्यांचा गट स्थापन करणार
सेलू/परभणी : शेतीपूरक व्यवसायासाठी सेलू तालुका बळीराजा संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून, दुग्धव्यवसायासह अन्य शेतीपूरक व्यवसाय उभारण्यासाठी सेलू तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये दहा शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करण्यात येणार आहे.
समितीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. बळीराजा संघर्ष समितीची बैठक उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर यांच्या शेतामध्ये शनिवारी, ३० डिसेंबर रोजी पार पडली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशराव माने, संघटक अशोक उफाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी बळीराजा संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून दुग्ध व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातून दहा शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, डेअरी, आदी व्यवसायांचे मार्गदर्शन शिबिर आणि अभ्यास सहली काढण्याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष रमेश माने यांनी वृक्षलागवडीची सविस्तर माहिती दिली, तर समितीचे संघटक अशोक उफाडे यांनी गाव, शेती आणि शेतकरी यांच्या जमेच्या बाजू सांगून वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर यांनी केले. यावेळी अनेक तरुण शेतकऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आभार प्रदर्शनानंर वन भोजनात झाले. बैठकीला समितीची पदाधिकारी, सदस्य व तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.