छत्रपती शिवरायांमुळेच हिंदू म्हणून जिवंत : सौरभ करडे; सेलूतील स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला
सेलू,जि.परभणी : देव, देश आणि धर्म रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सकल सुखाचा त्याग केला. शिवराय भोगी नव्हे, तर श्रीमंत योगी होते. मुघल व परकीय आक्रमकांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध शौर्याने लढा देऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळेच आज स्वातंत्र्याची पहाट शिल्लक असून, आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत, असे परखड मत शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरभ करडे यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालय व देवगिरी नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे हे १२ वे वर्ष आहे. त्यातील दुसरे पुष्प गुंफताना ४ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानात श्री करडे बोलत होते. ” शिवरायांचा आठवावा प्रताप ” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह हेमंत वैद्य होते. संयोजक उपेंद्र बेल्लूरकर, हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.
सौरभ करडे यांनी आपल्या घणाघाती, आवेशपूर्ण भाषणात शिवाजी महाराजांच्या ३६ वर्षाच्या कारकीर्दीतील सूक्ष्म नियोजन व अभ्यासपूर्ण रणनितीचा रोमांचकारी इतिहास सांगत जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करून शौर्याचा इतिहास निर्माण केल्याचे सांगितले.
हेमंत वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघ प्रचारक स्व.जनुभाऊ रानडे यांच्या समर्पित सेवा कार्याचा वारसा संस्थेने समाजकार्य व शिक्षणाबरोबर नाळ जोडत पुढे नेण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात आयोजिण्याक आलेल्या व्याख्यानाचा आरंभ मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाला. शालवी सावरगावकर आणि विद्यार्थीनी स्वागत गीत सादर केले. गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. करूणा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. शंतनू पाठक यांनी पद्य गायिले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले. उपेंद्र बेल्लूरकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने सांगता झाली. व्याख्यानमालेसाठी देवगिरी बँकेचे व्यवस्थापक विश्वास देव ,कर्मचारी, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शितोळे, शिक्षक आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. व्याख्यानाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.