मानवतमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा; स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची उपस्थिती, ९ हजार भाविकांचे श्री ज्ञानेश्वरी पारायण
मानवत (जि.परभणी) : येथील ज्ञानेश गुरुकुलच्या वतीने सुरू असलेल्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त सोमवारपासून (२६ फेब्रुवारी) मानवत शहरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज भागवत कथा सांगणार आहेत.
पाळोदी रोडवरील त्रिमूर्तीनगरच्या भव्य प्रांगणात चार मार्चपर्यंत हा दिव्य कथा सोहळा आयोजिण्यात आला आहे. सप्ताह दरम्यान सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण होणार असून, या पारायणामध्ये ९ हजार भाविक सहभागी होणार आहेत. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा होणार आहे. कथेचे यजमान संजयकुमार द्वारकादास लड्डा आहेत. रात्री ८ ते १० महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आहे. अच्युत महाराज दस्तापूरकर, ज्ञानोबा माऊली मुढेकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, उमेश महाराज दशरथे, माऊली महाराज कदम, मनिषानंद पुरी महाराज, पांडुरंग महाराज घुले यांची कीर्तने होणार आहेत. चार मार्च रोजी काल्याचे कीर्तन रामराव महाराज ढोक करणार आहेत. मंगळवारी पाच हजार विद्याथ्यांचे सामूहिक गीतापठण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य प्रवर्तक पंडित महाराज डाके, रामराव महाराज हेंडगे, स्वागताध्यक्ष पंकज आंबेगावकर, कार्याध्यक्ष डॉ. अंकुश लाड, उपाध्यक्ष सुरेश काबरा, बाबासाहेब होगे, सचिव रेणकोजी दहे, ज्ञानेश्वर मोरे, सहसचिव मोहन लाड, दिनकर कोक्कर, कोषाध्यक्ष शैलेश काबरा, कल्याणराव शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.