मातीस्नानाने धुलिवंदन साजरे
सेलूतील गांधी प्राकृतिक चिकित्सा व भांगडिया रुग्णसेवा मंडळाचा उपक्रम
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ यांच्या वतीने होळीनिमित्त सोमवारी, २५ मार्च रोजी सेलूकरांनी मातीस्नानाची परंपरा यंदा अठराव्या वर्षीही जपत धुलिवंदन साजरे केले.
सेलू येथील चंद्रप्रकाश सांगतांनी व गंगाधर शेरे पाटील यांच्या शेतात धुलिवंदनानिमित्त मातीस्नानाचा उपक्रम सुरू झाला. करोना काळाचा अपवाद वगळता हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या वर्षी सोमवारी मंठा रोडवरील मालाणी यांच्या शेतातील ॲग्रो टुरिझम अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हॉटेल परिवार फार्म रेस्टॉरंट परिसरातील निसर्ग सानिध्यात पारंपरिक मातीस्नानाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्राचीन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला गेला. रंगाचा वापर न करता, नैसर्गिक व वैज्ञानिक पद्धतीने धुलिवंदन साजरे करण्यात येते. यामुळे उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे.ज्ञमातीस्नानानंतर कडधान्यमिश्रित उसळ, आर्युवेदिक काढा देऊन पाहुणचार केला जातो. गांधी प्राकृतिक चिकित्सा मंडळाचे समन्वयक शिवनारायण मालाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद बाहेती, गोविंद कासट, रामवल्लभ राठी, प्रवीण माणकेश्वर, रेवा कुंदनानी, सुभाष मोहकरे, बाबासाहेब हेलसकर, कृष्णा काटे, भगवान पावडे, शेख मुमताज, शेख फिरोजखान, शेख आझाद, भास्कर घोडके आदींनी पुढाकार घेतला. विकास भुते, कुमार हात्तरगे, सुनील गायकवाड, प्रेमगोपाल कासट, सतीश जाधव, अक्षय हुगे, शुक्राचार्य शिंदे, सुमीत व्यंकटकर, श्रीनिवास टाक, महेंद्र पडगे, गणेश राखुंडे, छत्रभुज गोरे आदींसह नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.
मृदास्नानाला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. वारूळाची माती, चंदन, निमपत्र, वैखंट, शतावरी, गाई शेण, तुरटीचे पाणी, गोमुत्र, ज्येष्ठ मध, अश्वगंधा आदींचे मिश्रण चार दिवस मिश्रण पाण्यात भिजवण्यात येते. शरीराची लसूण तसेच तीळ तेलाने मालिश केल्यानंतर मातीचा लेप शरीरावर लावण्यात येतो. तासभर उन्हात बसून सुकवला जातो. त्यानंतर सचैलस्नान केले जाते. ऋतुचक्राप्रमाणे शरीराला मातीस्नान उपकारक ठरणार आहे. – शिवनारायण मालाणी, समन्वयक, महात्मा गांधी प्राकृतिक चिकित्सा व योग मंडळ, सेलू जि.परभणी