मतदानाचा टक्का वाढीसाठी संघटनांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन
परभणी : लोकशाही समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे. ही प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राष्ट्रीय कार्यात सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात मतदान जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने मंगळवारी, दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध संघटनांची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ, डॉ.राजगोपाल कालानी, निवडणूक अव्वल कारकुन डी.एम.गिनगिने आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्वतःच्या कुटुंबासह जवळच्या व्यक्ती, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मागील निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदान जनजागृतीच्या माध्यमातून ७५ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रास्ताविकात नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे यांनी स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती संदर्भात माहिती दिली. व्यापारी, अखिल भारतीय वारकरी, क्रीडा, वस्तीगृह, कोचिंग क्लासेस, आयएमए, पॅथॉलॉजिस्ट, सायकलिंंग, योग साधना, पतंजली योग समिती, महिला विकास महामंडळ, माजी सैनिक,पेन्शनर, कोरियोग्राफर, कल्चरल , जिल्हा ग्रंथालय, लायन्स क्लब, जिम, दिव्यांग आदी ३६ संघटनांच्या प्रतिनिधींसह स्वीप सदस्यांची उपस्थिती होती.