शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर गोविंद जोशी व्रतस्थपणे लढले : प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर; जोशी यांचा अमृत महोत्सवानिमित्त सेलूमध्ये सत्कार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर गोविंद जोशी व्रतस्थपणे लढले : प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर; जोशी यांचा अमृत महोत्सवानिमित्त सेलूमध्ये सत्कार

सत्काराला उत्तर देताना गोविंद जोशी म्हणाले की, शरद जोशी एक विचार घेऊन पुढे आले आणि माझ्यासारखे असंख्य शेतकरी त्यात पुढे आले. शेतकऱ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अनेक आंदोलने झाली. आपण जे काम करतो त्याला आचार आणि विचार असणे आवश्यक आहे. शेतकरी संघटनेत जे टिकले ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

सेलू जि.परभणी : शेतकरी संघटनेच्या कार्यात आयुष्यभर स्वतःला झोकून देणे इतके सोपे नाही परंतु विचारांची प्रगल्भता आणि जीवनात निश्चित केलेले ध्येय या बळावर शेतकरी संघटनेचे घेतलेले व्रत गोविंद जोशी यांनी आयुष्यभर जपले आहे, असे गौरवोद्गार नूतन संस्थेचे सचिव डॉ विनायकराव कोठेकर यांनी काढले.

शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष तथा जेष्ठ नेते गोविंद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “अमृतायन ” या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी,१६ एप्रिल रोजी साईबाबा मंदिराच्या भव्य सभागृहात साई मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गोविंद जोशी, पत्नी सुयशा जोशी, रामराव रोडगे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुकेशराव बोराडे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी,नंदकिशोर बाहेती, श्री के.बा.शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. कोठेकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न गोविंद जोशी यांनी सोडवले आहेत. केवळ शेतकरी संघटना किंवा केवळ शैक्षणिक कार्य नाही, तर शहरात होणाऱ्या संगीत महोत्सवात देखील गोविंद भाऊ जोशी यांचे योगदान अतुलनीय आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात गोविंद भाऊंचे योगदान महत्वाचे आहे हे निश्चित तरुण पिढीसाठी मार्गदर्शक कार्य आहे,
यावेळी सुयशा जोशी, अनंतराव पवार, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्राह्मवृंदाच्या मंत्रघोषात गोविंद जोशी यांना मानपत्र देऊन त्यांचा अमृत महित्सवी वर्षानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन नाट्यकलावंत रवी कुलकर्णी यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना गोविंद जोशी म्हणाले की, शरद जोशी एक विचार घेऊन पुढे आले आणि माझ्यासारखे असंख्य शेतकरी त्यात पुढे आले. शेतकऱ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अनेक आंदोलने झाली. आपण जे काम करतो त्याला आचार आणि विचार असणे आवश्यक आहे. शेतकरी संघटनेत जे टिकले ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत. यावेळी गोविंद जोशी यांनी शेतकरी संघटनेची आंदोलने तसेच विचारांच्या आठवणींना उजाळा दिला. कुटुंबाने देखील शेतकरी संघटनेच्या कार्यात मला साथ दिली. आम्हाला जो अभिरुचीचा वारसा मिळाला तो शरद जोशी यांच्याकडून मिळाला. यावेळी त्यांनी त्यांचे बंधू किशोर जोशी यांचाही आवर्जून उल्लेख केला. किशोर जोशी यांनीही मोलाची साथ दिल्याचे ते म्हणाले. सेलू एक असे रसायन आहे, की इथे आलेला माणूस आपोआप संस्कारी होतो.सेलूमध्ये माझ्यावर चांगले संस्कार झाले. आणि या शहरात राहून संघटनेचे कार्य करता आले याचा अभिमान असल्याचे गोविंद जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले, आभार माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी मानले. यानंतर सारेगमप फेम प्रसिद्ध गायक अनिकेत सराफ यांच्या भावगीत भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री के.बा.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी, राखी जोशी, तेजसी जोशी, किरण जोशी, गायिका वर्षा जोशी, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, गंगाधर कान्हेकर, प्रा.संजय पिंपळगावकर, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, राजेंद्र पवार, संतोष बेंडे, शंकर राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!