परभणी लोकसभा : भाजप संविधान बदलू शकते : ॲड.प्रकाश आंबेडकर; पंजाब डख यांच्या प्रचारार्थ परभणीमध्ये सभा

परभणी लोकसभा : भाजप संविधान बदलू शकते : ॲड.प्रकाश आंबेडकर; पंजाब डख यांच्या प्रचारार्थ परभणीमध्ये सभा

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान भारतीय जनता पार्टीचे सरकार बदलू शकते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (१९ एप्रिल) परभणी येथे आयोजित सभेत केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ॲड.आंबेडकर बोलत होते. याप्रसंगी उमेदवार पंजाब डख, पक्षाचे प्रवक्ते डॉ.धर्मराज चव्हाण, सुरेश शेळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की; ‘अबकी बार चारसोपार’ असा नारा दिला जात आहे. त्यामागील अर्थ सामान्य मतदारांनी ओळखला पाहिजे. विशेषतः या संख्याबळाच्या आधारावरच भाजप घटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करू इच्छित आहे. एकीकडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना कोणीही बदलू शकत नाही, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कधीही म्हणत नाही की; मी घटना बदलणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष घटना बदलू शकते. अशा घटना बदलवू इच्छिणाऱ्या भाजप महायुतीला कदापि मतदान करू नका. आंबेडकर म्हणाले की; व्यापाऱ्यांचे आणि सरकारचे साटेलोटे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील या सरकारला घरी बसवले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच नरेंद्र मोदी दहा वर्षे पंतप्रधानपदी राहिले आहेत. पण आता मोहन भागवत हे नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निरोप पाठवत आहेत; वेळ मागत आहेत. पण भागवतांना भेटण्यासाठीदेखील मोदींकडे वेळ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज त्यांना आता राहिली नाही, असेही आंबेडकर या वेळी नमूद केले. भर उन्हात सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!