परभणी लोकसभा : भाजप सरकारला तडीपार करा : उध्दव ठाकरे यांचा घणाघात; परभणीमध्ये भरपावसात जंगी सभा
परभणी : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही अशीच आहे. त्यामुळे विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून हुकुमशाही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला देशातून तडीपार करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) रात्री भरपावसात झालेल्या लक्षवेधी जंगी जाहीर सभेतून केले.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्टेडिअम मैदानावर मंगळवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, उमेदवार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड, माजी आमदार विजय गव्हाणे, मिराताई रेंगे, सुरेश देशमुख, विजय भांबळे, सुरेश जेथलिया, सीताराम घनदाट, संतोष सांबरे, विशाल कदम, ए.जे.बोराडे, डॉ.विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, भगवानराव वाघमारे, गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे यांनी भर पावसात केलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी यांचे नाणे, मोदी यांचा चेहरा या महाराष्ट्राच्या निवडणुकीत यंदा चालणारा नाही, हे ओळखूनच या मंडळींनी हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. आपल्या कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. आपण हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहोत, याचा मला अभिमान आहे. घराणेशाहीबद्दल विरोधकांना बोलण्याचा काडीचा अधिकार नाही. घराणेशाहीबद्दल जनताच ठरवेल. पण तुमच्या एकाधिकारशाहीबद्दल सातत्याने आम्ही निश्चितच बोलणार. गेल्या दहा वर्षांपासून आपण सत्तेच्या माध्यमातून एकाधिकारशाही चालविली आहे. त्या माध्यमातूनच आपण उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहात. पण महाराष्ट्रातील मर्द मावळा हा आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा मोदीशहांनी वल्गना करु नयेत, असा इशारा ठाकरे यांनी दिला. दिल्लीत बसून आपण देशभर विरोधकांविरोधात कारवाया करत आहात. महिलांबद्दल अपशब्द वापरत आहेत. अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातील जनतेने एकही मत देऊ नये. भाजपला आता बोलण्यासारखे मुद्दे राहिले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासूनची सुरू असलेल्या आणि आता जुमला-३ भागात आलेल्या मालिकेला बंद करण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले.
विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित राहीलच. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या जिल्ह्याने सातत्याने प्रेम केले आहे. याही निवडणुकीत प्रेम, आशिर्वादाच्या रुपाने मतदार पाठीशी उभा राहिल, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. बंडू जाधव हे अत्यंत निष्ठावान आणि कट्टर मावळे आहेत. परभणीकरांचा निर्धारही पक्का आहे. तेव्हा विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.