शोकसभा : सच्चा समाजसेवक हरपला; हाफेज मोहंमद अफजलखाँ यांना विविध स्तरांतून श्रद्धांजली
सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयमध्ये शोकसभा
सेलू : शहरातील सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात पुढाकार घेणारे स्व.हाफेज मोहंमद अफजलखाँ यांचे बुधवारी निधन झाले. पत्रकार मोहंमद ईलियास यांचे ते वडील होत. हाफेजजी यांच्या निधनाबद्दल रविवारी, १२ मे रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयमध्ये शोकसभा आयोजिण्यात आली होती. सेलू तालुका पत्रकार संघ व मित्र मंडळ यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांकडून हाफेजजी यांच्या आठवणींना उजाळा देत, हाफेजजी यांच्या निधनामुळे एक सच्चा समाजसेवक हरपला, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर मौलाना खाजा सहाब कासीम, अशोकराव काकडे, रहिमखाँ पठाण, मराठी पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी मौलाना खाजा सहाब कासीम म्हणाले की,सेलू शहरात मुलांना धार्मिक शिक्षण सहजतेने उपलब्ध होण्यासाठी मदरसा सुरू केली आज या मदसातून लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी मदिना मश्जीद येथे २५ वर्ष इमाम म्हणून काम करीत येथील रूप बदलून टाकले. अशा धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांत स्व. हाफेजजी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा समाजसेवक हरपला अशी भावना जन माणसात निर्माण झाली आहे.
अशोकराव काकडे म्हणाले, मनुष्य किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे.आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून हाफेजजी यांनी गरजूंना केलेली मदत आणि सामाजिक दायीत्व यामुळे त्यांचे जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. रहिमखान पठाण म्हणाले की, हाफेजजी यांचे व्यक्तिमत्त्वात सेवाभाववृत्ती, दानसुरता, वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर मिलाफ झालेला होता.
पत्रकार रेवणअप्पा साळेगांवकर म्हणाले की, जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे. पण या दोघांमधील कालावधी म्हणजे कर्म ज्यांचे कर्म चांगले असेल त्याला ईश्वरलिलात देवमार्ग प्राप्त होते. मरावे परी कीर्ती रुपी उरावे अशी कीर्ती असणारे हाफेजजी यांनी उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यातून माणसे जोडण्याचेही काम केले. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो त्यांना देवमार्ग मिळो. याशिवाय त्यांचे कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो असे म्हणाले.
ॲड.श्रीकांत वाईकर म्हणाले की, हाफेजजी हे व्यक्तीमत्व म्हणजे जिद्द, मेहनती व चिकाटी या गुणांवर त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीने जनमानसांत वेगळा ठसा उमटवला त्यांचे जाण्याने निर्माण झालेली उणीव भरून निघणार नाही अशीच आहे.
प्राचार्य सुरेश नाईकवाडे म्हणाले की, या कुटुंबाच्या दुःखात पत्रकार संघ सहभागी आहे. सर्व मान्यवरांनी हाफेजजी यांना शब्दरूपी वाहीलेली श्रध्दांजली हीच कीर्ती अजरामर आहे. शेवटी पत्रकार मोहंमद ईलीयास यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी राहूल देशपांडे, ॲड.किशोर जवळेकर, अनिरूध्द जोशी, अशोक फोपसे, पत्रकार राम सोनवणे, माजी सभापती रवि डासाळकर, डॉ. अरविंद बोराडे, सुरेंद्र गिल्डा, मिलिंद पवार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.